वाशिम

Washim News | अडाण नदीत बुडून सख्ख्या मामे-आतेभावांचा मृत्यू

मोठ्या आणि खोलगट गड्ड्याचा अंदाज न आल्याने दोघेही त्या खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले

पुढारी वृत्तसेवा

इंझोरी : पवित्र अधिक महिन्यानिमित्त अडाण नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुण युवकांचा पाण्यात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना रविवारी, १४ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोमुखेश्वर संस्थानजवळ घडली. शुभम अमोल धोंडे (वय १४, रा. इंझोरी) आणि त्याचा आतेभाऊ दर्शन सुनील वावगे (वय २०, रा. भातकुली, जि. अमरावती) अशी मृत पावलेल्या दोन्ही सख्ख्या मामे -आतेभावांची नावे आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण इंझोरी गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पवित्र अधिक महिना सुरू असल्याने धार्मिक परंपरेनुसार नदीवर स्नान करण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी शुभम आणि अमरावतीवरून आलेला त्याचा आतेभाऊ दर्शन हे दोघे गोमुखेश्वर संस्थानजवळील अडाण नदीच्या पात्रात गेले होते. पोहता पोहता नदीच्या पात्रात असलेल्या एका मोठ्या आणि खोलगट गड्ड्याचा अंदाज न आल्याने दोघेही त्या खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले.

दोघेही पाण्यात बुडत असल्याचे नदीकाठावर खेळत असलेल्या लहान मुलांच्या लक्षात आले. त्यांनी कसलाही विलंब न करता तात्काळ आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलांचा जीवघेणा आक्रोश ऐकून नदीच्या पात्रात मासेमारी करणारे स्थानिक कोळी बांधव आणि जवळील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या आणि मासेमारांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर दोघांनाही तातडीने पाण्याच्या बाहेर काढण्यात आले.

ही धक्कादायक वार्ता वाऱ्यासारखी इंझोरी गावात पसरताच धोंडे परिवारातील महिला व पुरुषांसह ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून गावातील युवक विशाल वानखेडे यांनी स्वतःचे चारचाकी वाहन घटनास्थळी आणले. बेशुद्ध अवस्थेतील शुभम आणि दर्शन यांना तात्काळ वाहनात टाकून कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली असल्याचे घोषित केले. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच नातेवाईकांनी रुग्णालयातच एकच आक्रोश केला.

कुटुंबाचा एकुलता एक दिवा विझला

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेला शुभम हा अमोल धोंडे यांचा एकुलता एक मुलगा होता. तो गेल्या एक वर्षापासून आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत होता आणि अध्यात्माचे धडे गिरवत होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे तो आपल्या गावी, आई-वडिलांकडे आला होता. सुट्टीच्या दिवसांत घरी आलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलावर आणि भाच्यावर काळाने असा अचानक घाला घातल्यामुळे धोंडे आणि वावगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन तरुण मुलांचा असा अकाली अंत झाल्याने संपूर्ण मानोरा तालुक्यात तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT