वाशिम : जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यात अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी नागरिकांची धावपळ उडाली आहे.
हवामान विभागाने वाशीम जिल्ह्यासह विदर्भातील काही भागांत पुढील ३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाची संततधार सुरू असून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अतिवृष्टी झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.