

वाशीम : गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या वाशीमकरांना अखेर आज सायंकाळी पावसाने मोठा दिलासा दिला. आज दुपार पासून पाऊसाचे वातावरण होते, सायंकाळी 4:30 वाजता दरम्यान शहरात अचानक कोसळलेल्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे शहरातील तापमानात लक्षणीय घट झाली असून वातावरण आल्हाददायक बनले आहे.
पावसाच्या सरींमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले. तर दुसरीकडे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, मान्सूनच्या आगमनाची नागरिक आतुरतेने वाट पाहत असताना झालेल्या या पावसाने उष्णतेच्या झळा कमी केल्या आहेत. आगामी काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहिल्यास नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. "उकाड्याने हैराण झालेल्या वाशीमकरांसाठी पावसाच्या सरी ठरल्या दिलासादायक; शहरात गारव्याची सुखद चाहूल लागल्या मुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.