Sant Sevalal Maharaj Janmotsav 2026
वाशिम : येत्या १५ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा श्री. संत सेवालाल महाराज जन्मोत्सव हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर जन्मोत्सव काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी योग्य नियोजन व परस्पर समन्वय राखून आपापली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.
श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सवाच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजन व व्यवस्थापनाबाबत मंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पोहरादेवी येथील नंगारा भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस विधान परिषद सदस्य आमदार धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे,पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज तसेच विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी त्यांनी कार्यक्रमस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन नियोजन, सुविधा व आवश्यक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
मंत्री राठोड म्हणाले की, दरवर्षी श्री. संत सेवालाल महाराज जन्मोत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव साधेपणाने व एकाच दिवसासाठी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे स्वरूप साधे ठेवून धार्मिक व सामाजिक शिस्त पाळत आयोजन करण्यात येईल.
बैठकीत भाविकांच्या सुरक्षितता व सोयीसुविधांबाबत पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था, वाहतूक व पार्किंग नियोजन, गर्दी नियंत्रण, आरोग्य सुविधा तसेच आपत्कालीन सेवांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत राहील, यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की, जन्मोत्सवाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला असून, भाविकांच्या सुरक्षितता व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता यंत्रणांमध्ये आवश्यक समन्वय साधून वेळबद्ध नियोजन आराखडा तयार करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.
कार्यक्रमाच्या कालावधीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीची शक्यता लक्षात घेता पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता व सुरक्षाव्यवस्था सुनिश्चित करावी, संबंधित विभागांनी दिलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे असे निर्देश मंत्री राठोड यांनी दिले. बैठकीला काही प्रमुख अधिकारी दुरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले.