Lost Luggage Recovered
वर्धा : मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत रेल्वे सुरक्षा बल वर्धा यांनी प्रवासी सुरक्षा व सहाय्याबाबतची बांधिलकी पुन्हा सिद्ध करत विविध घटनांमध्ये हरवलेले साहित्य शोधून ते संबंधित प्रवाशांना सुरक्षितपणे परत केले आहे.
एका प्रकरणात, गाडी क्रमांक १२८१० हावडा मेल एक्सप्रेसच्या कोचमधून एक प्रवाशाचा राहिलेली बॅग जप्त करण्यात आला. या बॅगमध्ये मोबाईल, चार्जर व इतर वैयक्तिक वस्तू होत्या. सदर बॅग सुरक्षित ठेवून आवश्यक पडताळणी नंतर सुमारे १८ हजार ८०० रुपये किंमतीचे साहित्य संबंधित प्रवाशास सुपूर्द करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत, नियमित ड्युटीदरम्यान प्लॅटफॉर्मवर एक बेवारस मोबाईल आढळून आला. तो आरपीएफ पोस्टमध्ये जमा करण्यात आला व मोबाईलवर आलेल्या कॉलद्वारे मालकाचा शोध घेण्यात आला. आवश्यक पडताळणी नंतर सुमारे १८ हजार रुपयेकिंमतीचा मोबाईल सुरक्षितपणे परत करण्यात आला.
तसेच, गाडी क्रमांक ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये राहिलेला एक बॅगही जप्त करण्यात आला. तपासणीअंती त्यात दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्कम मिळून सुमारे १० हजार ७५४ रुपये किंमतीचे साहित्य आढळले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा बॅग संबंधित व्यक्तीस सुपूर्द करण्यात आला.
याचप्रमाणे, गाडी क्रमांक १२९४९ कविगुरू एक्सप्रेस मध्ये राहिलेला सुमारे ८० हजार रुपये किंमतीचा एक महागडा मोबाईलही तत्परतेने जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला व पडताळणी नंतर संबंधित प्रवाशास परत करण्यात आला.
या सर्व घटनांमध्ये आरपीएफ वर्धा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्कता व कार्यतत्परता दाखवत प्रवाशांचे साहित्य सुरक्षित परत करण्याचे प्रशंसनीय कार्य केले आहे.
प्रवासादरम्यान साहित्याची काळजी घ्यावी व कोणतीही मदत आवश्यक असल्यास रेल्वे हेल्पलाईन किंवा आरपीएफशी संपर्क साधावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीन करण्यात आले आहे.