विदर्भ

Suicide : पुरात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्त्या

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने शेतातील उभे पीक खरडून गेले. त्यामुळे निराश झालेल्या एका 54 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. शनिवारी (3 सप्टेंबर) चिमूर तालुक्यातील पिंपळनेरीपेठ येथे ही घटना घडली. विजय दादाजी रोकडे (वय 58वर्ष) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

ऑगस्ट महिन्यात चिमूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. तालुक्यातील उमा नदीसह छोटे मोठे नाले भरून वाहू लागल्याने परिसरात महापूर आला. त्यामुळे शेतात लागवड करण्यात आलेली पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. तालुक्यातील पिंपळनेरी पेठ येथील शेतकरी विजय रोकडे यांची स्वतःची 6 एकर शेतजमीन आहे. तसेच ते गावातील काही लोकांची शेतजमीन ठेका घेऊन करतात. यावेळी त्यांनी शेतात कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केली होती, परंतु त्यांची शेतजमीन नाल्यालगत असल्याने महापुराने संपूर्ण पीक उध्वस्त झाले. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई घोषित केली. नुकसानीचे पंचनामे झाले, परंतु शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप कोणतीही मदत पडलेली नाही. रोकडे यांचे नुकसान झाले तेव्हापासून ते चिंताग्रस्त होते. शनिवारी त्यांनी शेतातील पीक नष्ट झाल्याच्या कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केली.

रोकडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. यावेळी महापुरामुळे शेतातील पिकांचे झालेले नुकासान तसेच दरवर्षी कोणते न कोणते येणारे संकट यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. रोकडे यांच्या उत्पादनात यावर्षी घट झाली तसेच त्यांना दरवर्षीच नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज, उसने घेतलेले पैसे चुकते करण्यास अडचण येत होती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT