Vijay Wadettiwar opposes the Samruddhi Mahamarg expansion
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नव्या महामार्ग प्रकल्पांवरून राजकीय वातावरण तापले असताना, समृद्धी महामार्गाच्या चंद्रपूरपर्यंतच्या विस्ताराला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कडाडून विरोध केला आहे. सुपीक शेतीजमिनी बळजबरीने संपादित केल्या जात असल्याचा आरोप करत सरकारने तातडीने फेरविचार करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.
नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांपर्यंत करण्यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाच्या विस्ताराच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक आणि हक्काच्या जमिनी बळजबरीने संपादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणी केली जात असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत.
विकासाच्या नावाखाली बळीराजाला भूमिहीन करून काही मोजक्या कंत्राटदार आणि उद्योगसमूहांना लाभ मिळत असेल, तर तो विकास जनहिताचा ठरू शकत नाही. सरकारने या प्रकल्पाचा तातडीने फेरविचार करावा, अन्यथा व्यापक लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी त्यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही नेत्यांनी केलेल्या कथित वक्तव्याचाही निषेध केला. देशाच्या भविष्यासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीचाही उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना वाढत असून, त्यातूनच हा असंतोष व्यक्त होत आहे.
नाशिक येथील आगामी कुंभमेळ्याच्या तयारीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कंत्राटी गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत, मोजक्या कंत्राटदारांनाच कामे देण्यात आल्याने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये पारदर्शकता ठेवून दर्जेदार विकासकामे करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.