Vijay Wadettiwar On CJP Protest Delhi
नागपूर : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला.
"विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकून त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पोलिसांची अशी क्रूर मानसिकता तर इंग्रजांच्या काळातही नव्हती. भाजप सरकारच्या काळात पोलिस यंत्रणा इतकी कठोर झाली आहे," असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या खिशात टाकण्यासाठी पोलिसांकडे ड्रग्स येतात कुठून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तरुणांना धमकावण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सरकारने चर्चा करून तोडगा काढावा, असे ते म्हणाले.
"महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ आहे. मात्र आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, सामान्य नागरिकांनाच पोलिसांपासून संरक्षणाची गरज भासत आहे," अशी टीका त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर असून त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका घेतली असून राज्यभर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तालुका स्तरावर पालकही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने जनभावना समजून घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
सरकार कोणतीही चर्चा करण्यास तयार नसून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्याचा परिणाम झाला आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांवर आरोप करण्याऐवजी सरकारने स्वतःच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. सरकार कर्जमाफीचे आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप करत त्यांनी कर्जमाफीच्या याद्यांमधील गोंधळामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे म्हटले. सरकारने या प्रकरणी तातडीने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.