Nagpur School Holiday Saturday
नागपूर : राज्यासह संपूर्ण देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून विदर्भ हा भाग सर्वाधिक तापमानाचा फटका सहन करत आहे. अकोला, वर्धा आणि नागपूर येथे तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून नागरिक अक्षरशः कडक उन्हाने हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेत शनिवारी (दि. 18) ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. याचा अर्थ पुढील काही तासांमध्ये किंवा दिवसभरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
संभाव्य उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. शनिवारी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच खासगी कोचिंग क्लासेस यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कडक उन्हात घराबाहेर पडावे लागू नये आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती देताना नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे परिधान करावेत तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची अधिक काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन सतर्क असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.