Caste Census
नागपूर : जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसले ? इतके दिवस याबाबतीत घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की घाणेरडं राजकारणच करणार? असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी (दि.१) केला.
केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी या नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी जातीचे संकुचित राजकारण केले. पण या जातीतील नागरिकांना प्रगतीच्या, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढ्या वर्षात या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. आता मोदी सरकारने या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून या देशातील सर्वच जाती प्रवाहांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प केला असताना त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी श्रेय लाटण्याचे काम ते करीत आहेत. यातून या विरोधी पक्षांची संकुचित मानसिकता देशाला पुन्हा एकदा दिसून आली, असाही टोला बावनकुळे यांनी यावेळी लगावला.