नागपूर : डिसेंबर २०२७ पूर्वी विदर्भ राज्य होणार असा निर्धार विदर्भवाद्यांनी आज ऑगस्ट क्रांतिदिनी केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या "मिशन २०२७" या कार्यक्रमांतर्गत, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी लोकांची वाढती मागणी आणि आंदोलनाची तीव्रता केंद्र व राज्य सरकारला पटवून देण्यासाठी, दीक्षाभूमी ते संविधान चौक अशी "विदर्भ निर्माण जनसंकल्प लाँग मार्च" (पदयात्रा) काढण्यात आली. समारोप संविधान चौकात एका जाहीर सभेने झाला. विदर्भवादी कार्यकर्ते तसेच विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांमधून आलेले विदर्भप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लॉंगमार्च दरम्यान "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे" , "लेके रहेंगे, लेके रहेंगे, विदर्भ राज लेके रहेंगे ", " विदर्भ आमचा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा", "आपले राज्य- विदर्भ राज्य", "विदर्भ के गद्दारो को जुते मारो सालो को ", "बीजेपी सरकार मुर्दाबाद", "महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद" अशी घोषणाबाजी करण्यात आली. या लॉंगमार्च चे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप, ज्येष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ पोहरे यांनी केले.
स्वतंत्र विदर्भ राज्याची न्याय्य मागणी आणि विदर्भातील जनतेवर होणारा अन्याय याकडे लक्ष दिले नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि त्याचे रूपांतर एका प्रचंड व निर्णायक जनलढ्यात केले जाईल. विदर्भातील संपूर्ण जनता या विरोधात रस्त्यावर उतरेल आणि अशा तीव्र आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी विद्यमान केंद्र व राज्य सरकारांवर असेल. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा लढा अधिक ताकदीने, एकजुटीने आणि वेगाने पुढे नेण्याच्या नूतन निर्धारासह या मेळाव्याची सांगता झाली.
या पदयात्रेत महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. मंजुषाताई तिरपुडे, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मसुरकर, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष ॲड. सुरेश वानखेडे, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख तात्यासाहेब मत्ते, ऍड. नीरज खांदेवाले, प्रा. पुरुषोत्तम पाटील, शिवाजी राजे, जाधव, कपिल इद्दे, संभाजी शिर्के, शंकरराव पारे, गजानन भटकर, राजेंद्र आगरकर, छईलबिहारी अग्रवाल, संजय केवट, राजेंद्र सिंग ठाकूर, कृष्णराव भोंगाडे, शालिक माऊलीकर, ओमप्रकाश तापडिया, राजेंद्र झोटिंग, अतुल सतदेवे, राखी भारद्वाज, दिलीप भोयर, अरविंद तायडे, प्रशांत नखाते, नरेश निमजे,मधुसूदन हरणे, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे , मुन्ना आवळे, गजानन अमदाबादकर, अरुण पाटील मुनघाटे, अशोक पोरड्डीवार, उल्लास कोटमकर सह हजारो कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते.