Jan Akrosh Morcha on RSS Headquarters
नागपूर : इराणमधून दोन जहाजे परतली त्याचा गवगवा केला जातो. मात्र अजूनही आपली 17 जहाजे त्यावरील 40 हजार लोक अडकली आहेत. हिंमत असेल तर ती परत आणा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
अमेरिकेच्या दडपणाखाली भारताची प्रतिमा मलीन करणाऱ्या मोदी यांना पदमुक्त करा, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांना केले. अन्यथा संघ बरखास्त करण्याची मागणी केली. आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयावर सोमवारी (दि.२३) जन आक्रोश संयुक्त मोर्चा काढला गेला. काँग्रेसने या मोर्चाला समर्थन दिल्याने आवश्यक खबरदारी म्हणून पोलिसांनी संविधान चौक, टेकडी रोड परिसर तसेच महाल, बडकस चौक परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त, बॅरिकेड्स लावले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते,पदाधिकारी यात सहभागी झाले.
भारत एक संविधानिक व्यवस्थेवर चालणारा देश आहे. पण एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आल्यामुळे मोदींनी देशाचे सार्वभौमत्व हे अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे. जगभरात ज्यांचे नाव एपस्टीन फाईलमध्ये आले त्यांचावर कारवाई झाली, पण मोदींवर कारवाई झाली नाही असा आरोप करण्यात आला.
आता हा लढा दिल्लीत उभारणार असल्याचा इशारा दिला. आम्ही पूर्वसूचना देऊनही सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीला निघून गेले. आम्हाला त्यांना संविधान आणि भारतीय राष्ट्रध्वज द्यायचा होता, याकडे लक्ष वेधले. अमेरिकेकडून ब्लॅकमेल केले जात असलेल्या मोदी यांना किती काळ पंतप्रधान ठेवायचे याचा निर्णय आरएसएसला घ्यावा लागेल, याकडे ॲड. आंबेडकर यांनी लक्ष वेधले.
संविधान चौक ते आरएसएस मुख्य कार्यालय, असा हा मोर्चा असला तरी पोलिसांनी मोर्चाला संविधान चौक ते टेकडी रोड या परिसरातच रोखण्याचे नियोजन केले होते. वंचित आरएसएस मुख्यालयावर मोर्चावर ठाम असल्याने काही काळ वातावरण तापले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, संघ परिवारावर टीकास्त्र सोडले.
अमेरिकाध्यक्ष ट्रम्प यांची तुलना तात्या विंचू अशी केली. अमेरिकेपुढे मोदी सरेंडर झाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये सरेंडर झाले, देशात सामान्य जनता सिलिंडरसाठी सरेंडर झाली अशी टीका केली. संघाने मोदी यांचा राजीनामा घ्यावा नाहीतर संघ बरखास्त करा, संविधान स्वीकारा असे आवाहन सपकाळ यांनी केले.
यापूर्वी तुषार गांधी यांच्यासोबत मी संघ विरोधात पुढे आलो. आज अॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वात पुन्हा याच वैचारिक लढ्यासाठी सोबत आलो. आंबेडकर यांच्या भाषणानंतर मोर्चा सुरु झाला. मात्र, ठरलेला मार्ग बदलून तो पुढे गेल्याने पोलिस आणि माध्यमांचीही तारांबळ उडाली. शेकडो पोलिस टेकडी रोडवर सज्ज होते. अखेरीस तासाभराच्या वाहतूक कोंडीतून सीताबर्डी, गोवारी उड्डाणपूल, टेकडी परिसर मुक्त झाल्याने पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.