Nagpur Congress political news
नागपूर : नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सलग दुसऱ्या बैठकीवरून आता पक्षातच गोंधळ उडाला आहे. पहिली बैठक प्रदेशाध्यक्षांनी आलेल्या तक्रारीनंतर अवैध ठरवली. आज (दि.१२) दुसरी बैठक घेण्यास आणि त्याचा अहवाल उद्या मुंबईत सादर करण्यास सांगितले असताना आजच्या बैठकीत देखील गटबाजी प्रकर्षाने उघड झाली. जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे वर्चस्व जपणारे माजी मंत्री सुनील केदार या बैठकीला स्वतः गैरहजर होते.
नुकतीच ७ नोव्हेंबर रोजी झालेली जिल्हा काँग्रेसची बैठक ही अवैध असल्याचे स्पष्ट करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ती अवैध ठरवली. जिल्हा पातळीवरील कोणतीही बैठक घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने अशी कोणतीही परवानगी न घेता बैठक घेतल्यामुळे ती वैध ठरत नाही. त्यांनी सर्व संबंधित पदाधिकारी आणि सदस्यांना पुन्हा एकत्र बोलावून अधिकृत मार्गाने बैठक घेण्याचे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांची चाचणी मुलाखती करून येत्या गुरुवारी यासंबंधीचा अहवाल प्रदेश काँग्रेसला देण्याचे सपकाळ यांनी निर्देश दिले.
दरम्यान, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज झाली. यापूर्वीच्या बैठकीत संघटनात्मक विषय, पक्षाची पुढील रणनीती आणि स्थानिक पातळीवरील कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता. मात्र, बैठकीची औपचारिक माहिती प्रदेश काँग्रेसला न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यासंबंधी केदार विरोधी गटाच्या तक्रारीनंतर तातडीने पक्ष निरीक्षक वीरेंद्र जगताप आणि इतर निरीक्षक यांना नागपुरात पाठविण्यात आले. केवळ एका गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेनुसार जिल्हा, तालुका किंवा शहर काँग्रेस कमिट्यांनी कोणतीही बैठक घेण्यापूर्वी प्रदेश काँग्रेसला कळविणे आणि त्याची मंजुरी आवश्यक आहे. त्याविना घेतलेली बैठक ही नियमबाह्य आणि अवैध ठरते. त्यामुळे त्यांनी नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीला सर्व सदस्यांना पुन्हा एकत्र बोलावून योग्य परवानगीसह बैठक घेण्याचे निर्देश सपकाळ यांनी दिले.
या घडामोडींमुळे विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. नागपूर जिल्हा काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याचे अनेकदा पक्षश्रेष्ठीना दिसून आले. जिल्हा स्तरावर संघटनात्मक कामकाजाचा वेग मंदावल्याने आणि पक्षातील काही नेत्यांकडून एकतर्फी निर्णय घेतल्याच्या तक्रारी वाढल्याने प्रदेश नेतृत्वाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.
राज्य आणि जिल्हा पातळीवरील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मते, या वादामुळे स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षातील एकजूट टिकवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्तक्षेपानंतर आता नव्याने बोलावली जाणारी बैठक देखील राजी नाराजीत लक्षवेधी ठरली आहे.