नागपूर : मौदा तालुक्यातील रामटेक - खात मुख्य मार्गावरील इंदोरा बायोमास बँक येथे तणसाच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली. यामध्ये सुमारे तीन ते चार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे,
इंदोरा बायोमास बैंक येथे शेतकऱ्यांकडून तणस खरेदी करून त्याचे चौकोनी सारखे गठ्ठे तयार केले जातात व ते इथेनॉल निर्मितीसाठी बाहेर निर्यात म्हणूनचपाठवले जातात. दुपारच्या सुमारास वाऱ्याच्या जोरामुळे शेजारच्या शेतातील आगीची ठिणगी या ढिगाऱ्यावर येऊन पडली. काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. यामुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोळ पसरले होते.
प्राथमिक माहितीनुसार, या आगीत सुमारे ३ हजार टन तणस जळून खाक झाले असून कंपनीचे अंदाजे चार कोटींचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मौदा व रामटेक येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच पाण्याचे टैंकर मागविण्यात आले. दुपारी उन्हाची वेळ आणि वारा वाहत असल्याने प्रदीर्घ प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण तणसाचा साठा जळून खाक झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.