नागपूर : नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवासीभिमुख करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची आढावा बैठक विधानभवनातील महसूलमंत्र्यांच्या दालनात पार पडली.
बैठकीत बसस्थानकांचे आधुनिकीकरण, नवीन बसेसची उपलब्धता आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांची गैरसोय होऊ नये. तसेच परीक्षांच्या दिवसात विद्यार्थ्यांना बस थांब्यांवर बस थांबविली जावी. वाहन थांब्यांसाठी आवश्यक असल्यास डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी यावेळी दिले.
नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकातील दुरवस्थेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी तातडीने २०० नवीन स्टीलच्या खुर्च्या, ५ वॉटर कुलर आणि प्रवाशांच्या निवासासाठी ५० बेडची अद्यावत डॉर्मिटरी बांधण्याच्या सूचना दिल्या. तसेच, येथील 'हिरकणी कक्ष' केवळ नावाला न ठेवता तो पूर्ण सोयींनिशी सज्ज असावा, असे निर्देशही दिले.
जिल्ह्यात सध्या १६० नवीन बसेसची आवश्यकता असून, त्यापैकी १०० बसेस (काटोल, गणेशपेठ, सावनेर, इमामवाडा, वर्धमाननगर) आधीच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रिक्त असलेल्या १५४ चालक-वाहकांच्या जागा दोन महिन्यांत भरण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. काटोल बसस्थानकाचे नूतनीकरण आणि कोंढाळी येथील काम पूर्ण झाले आहे. हिंगणा, रामटेक आणि उमरेड येथील बसस्थानकांचे काम सुरू आहे. बुटीबोरी, कुही, जलालखेडा आणि खापा येथील बसस्थानके सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) विकसित केली जाणार आहेत.
दरम्यान,ग्रामीण भागात बसेस थांबवल्या जात नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, परिवहन मंत्र्यांनी सर्व नियोजित स्टॉपवर बसेस थांबवणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नागपूरमधील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी 'नागपूर मेट्रोपोलिटन परिवहन कंपनी' स्थापन करण्याचा विचार असून, त्याचा आराखडा एप्रिल अखेरपर्यंत सादर केला जाईल. अमरावती डेपोचे कामही मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.