Agriculture Department on Monsoon Farmer Appeal
नागपूर/मुंबई : जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला असला, तरी राज्यातील बहुतांश भागांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदविला गेला आहे. आता 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, ही स्थिती पुढील किमान दहा दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली. मात्र, राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचे वितरण असमान राहिले आहे. विशेषतः खानदेशातील धुळे व नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर व सोलापूर, तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असून पुढील दहा दिवस सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ज्या भागांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, त्या ठिकाणी जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.