नागपूर : विकास केंद्रस्थानी ठेवून राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यानिमित्ताने दिवसभर जीडीपी बाबत चर्चा व चिंतन झाले. राज्याचा जीडीपी वाढविण्यात जैन समाजाने दिलेले योगदान मोठे आहे, असे गौरोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
नागपूर येथील पगारिया इस्टेटमध्ये आयोजित जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, जेबीएन महाकुंभाच्या मेगा राष्ट्रीय व्यापार कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पगारिया गृपचे प्रमुख उज्ज्वल पगरिया मंचावर उपस्थित होते.
औद्योगिक गुंतवणुकीसाठी भारताने प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला. भारताकडे मोठ्याप्रमाणात गुंतवणूकदार आकर्षित झाले. चायनाच्या आकर्षणापेक्षा भारताची विश्वासार्हता प्रधानमंत्री मोदींनी सिद्ध करून दाखवली. भारतात जीएसटी लागू करताना जगाला संभ्रम होता. अनेक अडचणीवर मात करून जीएसटीला भारताने यशस्वी करुन दाखविले असे ते म्हणाले.
देशाच्या विकासाच्या घोडदौडीत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुढे आहे. गुजरात,दिल्ली, कर्नाटक राज्यांच्या पेक्षा महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक जास्त आली आहे. महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटते व या राज्यावर त्यांचा विश्वास आहे असेही ते म्हणाले. उज्ज्वल पगरिया यांनी स्वागतपर भाषण केले. तत्पूर्वी उज्ज्वल पगरिया, कांतीलाल ओसवाल, उल्लास पगारीया यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.