![BBA, BCA, BAMS, CET, Entrance Exam](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2FProfessional-course.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी वृत्तसेवा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी यंदा प्रवेश परीक्षा घेण्यात आली. परंतु, या परीक्षेला जागांच्या तुलनेत केवळ ४० टक्के उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले.
त्यामुळे उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सीईटी सेलच्या मागणीनुसार राज्य शासनाने संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना सीईटी सेलच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर २९ जून ते ३ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
ज्या उमेदवारांनी २९ मे रोजी घेण्यात आलेली सीईटी परीक्षा दिली, अशा इच्छुक उमेदवारांना देखील अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत संधी APPLICATION FORM देण्यात आली आहे.
उमेदवारांनी दोन्ही परीक्षा दिल्या असतील, तर त्यापैकी सर्वोत्तम असणारे पर्सेटाईल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना आपली सर्वोत्तम पर्सेटाईलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक असणार आहे.
मागील महिन्यात २९ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेला ४८ हजार विद्यार्थी उपस्थित होते. राज्यात एक लाख ८ हजार ७४१ एवढ्या जागा असताना केवळ ४० टक्के जागा भरल्या जातील एवढेच उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. त्यामुळे उर्वरित ६० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त केली जात होती.
शिवाय हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिरिक्त सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीसीएस या अभ्यासक्रमांसाठी यंदा प्रवेश परीक्षा घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत कल्पना नसल्याने हे विद्यार्थी सीईटी परीक्षेपासून वंचित राहिले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काही विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी बंधनकारक असल्याचे समजले. त्यामुळे एक लाख ८ हजार ७४१ जागा असताना २९ मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेला केवळ ४८ हजार १३५ विद्यार्थी उपस्थित राहिले. परिणामी, उर्वरित जागा रिक्त राहण्याची भीती संस्थांचालकांकडून व्यक्त करण्यात येत होती. या सर्व गोष्टींचा विचार करून या अतिरिक्त सीईटीचे आयोजन करण्यात येणार आहे.