ऐतिहासिक विहीर  (Pudhari Photo)
नागपूर

Nagpur News | ऐतिहासिक विहिरीची स्वच्छता 10 दिवसांपासून बंद!

Nagpur Water Crisis | वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेली ही विहीर, एकेकाळी स्थानिक पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत होती, ती आता संकटात आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Water Crisis

नागपूर : मोतीबाग येथील २०० वर्षे जुन्या ऐतिहासिक महाकाय विहिरीच्या स्वच्छतेचे काम नुकतेच आग्नेय मध्य रेल्वे नागपूर विभागाने मोठ्या उत्साहात सुरू केले. वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेली ही विहीर, जी एकेकाळी स्थानिक पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत होती, ती आता संकटात आहे. झेडआरयूसीसीचे माजी सदस्य डॉ. प्रवीण डबली यांनी ही विहीर स्वच्छ करण्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न केले. त्यानंतर रेल्वेने ते पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले परंतु गेले 10 दिवस काम बंद असल्याने प्रयत्न अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छता मोहिमेच्या सुरुवातीच्या काही दिवसांत, यंत्रे आणि कामगारांची मोठ्या प्रमाणात तैनाती होती. पण गेल्या १० दिवसांपासून हे संपूर्ण काम अचानक बंद पडले आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व साफसफाई पूर्ण होण्याची अपेक्षा कमी आहे. स्थानिकांच्या मते, IOW विभागाने दोन 6 HP चे पंप काढून टाकले आहेत.

नागपूरसारख्या शहरात अनेक भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, तिथे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय हा पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय आहे. अनेक संघटनांनी याला जलसंपत्तीचा 'अवास्तव अपव्यय' म्हटले आहे. ते म्हणतात की जर संपूर्ण स्वच्छता योजना आगाऊ तयार केली नाही, तर फक्त पाणी काढून टाकणे म्हणजे संसाधनांचा अपव्यय ठरेल. तसेच, या कडक उन्हात शहरातील झाडांना पाणी देण्यासाठी या विहिरीतील ८० ते ९० लाख लिटर पाणी वापरले जाऊ शकले असते.

शहरातील रस्त्यांवरील दुभाजकांवर लावलेल्या झाडांना नाल्यातून पाणी आणून पाणी दिले जात आहे. अशा परिस्थितीत या विहिरीतून निघणारे पाणी टँकरद्वारे झाडांना पुरवता येईल. पण महानगरपालिका किंवा रेल्वेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही. रेल्वे विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कंत्राटदारासोबतच्या करारात काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत.

लाखो लिटर पाणी वाया गेले, पण स्वच्छता अपूर्ण....

आतापर्यंत, स्वच्छता प्रक्रियेचा भाग म्हणून लाखो लिटर पाणी विहिरीतून काढण्यात आले . पाणी काढून टाकण्यामागील उद्देश तळाशी साचलेला कचरा आणि गाळ साफ करणे हा होता. पण वास्तव असे आहे की आतापर्यंत फक्त पाणीच बाहेर काढण्यात आले आहे, तर तळाशी साचलेला प्लास्टिक, चिखल, दगड आणि इतर घनकचरा तसाच पडून आहे.

स्थानिक लोकांचा संताप

स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की रेल्वेने या ऐतिहासिक विहिरीच्या स्वच्छतेच्या नावाखाली फक्त देखावा उभा केला. रेल्वेने याबाबत स्पष्ट अहवाल द्यावा आणि पुन्हा संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू करावे आणि पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करावे अशी मागणी या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी अविरत परिश्रम घेणारे डॉ प्रवीण डबली आणि नागरिकांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT