Eknath Shinde on Uddhav Thackeray
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामरक्षा पठण कार्यक्रमास येत आहेत. यासंदर्भात छेडले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि.११) विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हणाले, जनतेने उद्धव ठाकरे यांना शिक्षा दिल्यामुळे आता त्यांना रामरक्षा आठवत आहे.
मात्र, ज्यांनी कधीकाळी हिंदूंच्या भावना दुखावल्या, राम मंदिर मुद्यावर टीका केली, हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांना कारागृहात टाकले आता त्यांना रामरक्षा आठवून उपयोग नाही. जनता सर्व समजते. आज राम मंदिराच्या चोरीवर ते बोलतात पण कधीकाळी मनसेचे पदाधिकारी किल्लेदार यांनी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट मधील गैरप्रकारांवर बोट ठेवले.खोक्याचा आरोप केला त्यावेळी उबाठाचे नेते का गप्प राहिले असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदे यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. पक्ष वाढीसाठी कधी नव्याने आलेल्याना संधी दिली जाते. शिवसेना दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे. राम मंदिर चोरी संदर्भात दोषी असलेल्या कुणालाही सोडले जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धोरणानुसार ते कुणाला खाऊ देणार नाहीत, स्वतः खाणार नाहीत. आरोपींना कारागृहात पाठविल्याशिवाय राहणार नाहीत असा दावा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात तो मोठेपणा आहे. विरोधकांकडे तो नाही. म्हणून ते चांगल्या निर्णयासाठी माझी तारीफ करतात, असेही स्पष्ट केले.
राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळी राजाचा आहे. यामुळेच राज्य सरकारने काल अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कर्जमाफीचा मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिला. कर्जमाफीबाबतची अट सरकारने काढून टाकली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.