दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दीक्षाभूमी येथील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.  Pudhari
नागपूर

Deekshabhoomi Nagpur | अध्यक्षांचा वाद महत्त्वाचा नाही, दीक्षाभूमीचा विकास जलद गतीने व्हावा

भदंत सुरेई ससाई यांची मागणी, जिल्हाधिकरी आणि एनएमआरडीएच्या अध्यक्षांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : 'अध्यक्ष येतील आणि जातील. अध्यक्षांचा वाद होत राहील, तो महत्त्वाचा नाही. जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीचा विकास आणि सौंदर्यीकरणाचे काम अजिबात थांबायला नको, ते अत्यंत जलद गतीने झाले पाहिजे,' अशी विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी जिल्हाधिकारी आणि एनएमआरडीएच्या अध्यक्षांकडे केली आहे. मंगळवारी सकाळी भदंत सुरेई ससाई यांनी दीक्षाभूमी येथील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

दीक्षाभूमीचा विकासाचे काम थांबायला नको

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे दीक्षाभूमीचे नाव आज जागतिक पातळीवर आहे. विविध राज्यातील तसेच देश-विदेशातील धम्मबांधव दीक्षाभूमीवर वंदन करायला येतात आणि येथून एक सकारात्मक ऊर्जा घेऊन जातात. या पवित्र दीक्षाभूमीकडे आज देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सध्या अध्यक्षांच्या वादामुळे दीक्षाभूमी चर्चेत आली आहे, परंतु अध्यक्ष येतील आणि जातील. माणसाच्या स्वभावानुसार वाद होतच राहतील. मात्र यामुळे दीक्षाभूमीचा विकास आणि सौंदर्यीकरणाचे काम थांबायला नको, असे भदंत ससाई यांनी स्पष्ट केले.

सर्व धम्मबांधवांनी विचार करून कृती करावी

या संदर्भात भदंत सुरेई ससाई यांनी जिल्हाधिकारी आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) चे अध्यक्ष यांना एक विशेष निवेदन दिले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आता अवघ्या चार महिन्यांवर आला आहे, ही बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याअनुषंगाने दीक्षाभूमी येथील संरक्षण भिंतीचे काम, धम्मचक्र दिनाच्या सोहळ्यासाठी लागणारा मुख्य स्टेज, ५६ फूट तथागत गौतम बुद्धांच्या चलित मुद्रेतील मूर्तीसाठीचा चबुतरा, भव्य स्तूपावरील बोधीवृक्षाच्या परिसरात तसेच संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात सौरऊर्जेवर चालणारी 'थीम बेस्ड' लायटिंग व इतर आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबधितांना आदेश द्यावे, अशी विनंती त्यांनी केली. हजारो वर्षांपर्यंत दीक्षाभूमीचे नाव तिच्या चांगल्या कामासाठी कायम स्मरणात राहील, यादिशेने सर्व धम्मबांधवांनी विचार करून कृती करावी, असे आवाहनही भदंत ससाई यांनी केले.

दगडी भिंतीचे अर्धवट काम पूर्ण करा

दीक्षाभूमीच्या पूर्व दिशेकडील संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले असले तरी या कामाला पाहिजे तशी गती मिळालेली नाही, याकडेही भदंत ससाई यांनी लक्ष वेधले. दीक्षाभूमीवर येणार्‍या अनुयायांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसह, स्तूपाच्या आतमध्ये जाण्यासाठी सध्या मोठी अडचण निर्माण होत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी दक्षिण दिशेकडील भव्य गेटचे काम आणि दक्षिण व पूर्व दिशेकडील बीम व कॉलमवरील दगडी भिंतीचे अर्धवट राहिलेले काम तातडीने पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पूर्व दिशेकडील प्रवेशद्वारामधून होणारी रहदारी बंद करता येणार नाही, असे सांगत भदंत ससाई यांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT