नागपूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री बदलणार किंवा देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चा फेटाळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी परवाच दिल्लीला जाऊन आलो," असे स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला.
नागपूरला मिळणार 'कॉन्व्हेन्शन हब'ची ओळख
नागपुरात उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत 'अॅग्रो कॉन्व्हेन्शन सेंटर'बाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकल्पामुळे नागपूरला देशाच्या नकाशावर एक नवीन ओळख मिळेल. येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, प्रदर्शन आणि संवाद मेळावे आयोजित केले जातील, ज्यामुळे कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळेल.
कर्जमाफी आणि कृषी क्षेत्रातील समस्यांवर भाष्य
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, "या योजनेत पूर्वीच्या कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ठरेल." यासोबतच, बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात तपासण्यात आलेल्या ५ हजार नमुन्यांपैकी ३०० नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले आहेत. अशा संबंधित कंपन्यांचे परवाने रद्द करण्यापासून ते त्यांच्यावर फौजदारी कारवाईपर्यंतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.