शिवसेना आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार अशोक धवड Pudhari
नागपूर

Vidarbha Express Protest Case | अशोक धवड, कृपाल तुमानेंना 37 वर्षांनंतर दिलासा : रेल्वे आंदोलन प्रकरणात निर्दोष मुक्तता

Nagpur News | नागपूर - मुंबई विदर्भ एक्सप्रेसच्या वेळेत बदल व्हावा यासाठी ३७ वर्षांपूर्वी आंदोलन : १६ आंदोलनकर्त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Session Court Verdict

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : नागपूर - मुंबई विदर्भ एक्सप्रेसच्या वेळेत बदल व्हावा यासाठी ३७ वर्षांपूर्वी आंदोलन प्रकरणी दाखल खटल्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार अशोक शंकरराव धवड यांच्यासह १६ आंदोलनकर्त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यात शिवसेना माजी खासदार आणि विद्यमान आमदार कृपाल तुमाने यांचाही समावेश आहे हे विशेष. न्यायाधीश मोहतेसीम बदर यांनी हा निर्णय दिला.

सरकारला आंदोलनकर्त्यांविरोधातील गुन्हे सिद्ध करणारे ठोस पुरावे सादर करता आले नाहीत असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी एकंदर 42 सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात दिवंगत माजी आमदार दिवाकर जोशी, ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे आदींचा समावेश होता. दिलासा मिळालेल्या

इतर आंदोलनकर्त्यांमध्ये दीपक पटेल, नंदकिशोर पापलवार, कमल गौतम, चंद्रकांत गोहणे, संजय शर्मा, संजय तिडके, रमेश पवार, बजरंगसिंग धर्मराज, रामगोविंद खोब्रागडे, राजू पटेल, दिनेश तराळे, अजाबराव ढोक, रवीशंकर राऊत व विनोद आलमडोहकर यांचा समावेश आहे. आंदोलनाच्यावेळी मुंबईला जाणारी विदर्भ एक्सप्रेस नागपूर येथून रात्री १०.३० वाजता सुटत होती.

ही वेळ बदलवून सायंकाळी ६.३० वाजता करण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी होती. यामुळे सकाळी मुंबईला पोहचता येईल व दिवसभर आवश्यक कामे करून सायंकाळी नागपूरकडे रवाना होता येईल, असे प्रवाशांचे म्हणणे होते. परंतु, या मागणीकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नव्हते.

परिणामी, धवड यांनी शहर काँग्रेस सेवादल व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांसह १ मे १९८८ रोजी रात्री १० च्या सुमारास मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील पहिल्या फलाटावर धडक देऊन नारे निदर्शने केली.विदर्भ एक्सप्रेस थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच रेल्वे पोलिस उप-अधीक्षक हिम्मतराव देशभ्रतार यांना मारहाण केली, असा आरोप होता मात्र तो सिद्ध झाला नाही.

रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३५३, ३३२, ३४१, ५०६ व महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम १३५ अंतर्गत एफआयआर नोंदवला होता व प्रकरणाच्या तपासानंतर ६ जून १९८८ रोजी सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. जनतेच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनाचा अखेर शेवट गोड झाला अशी भावना आज आमदार कृपाल तुमाने,माजी आमदार अशोक धवड यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT