वर्धा ; पुढारी वृत्तसेवा : विदर्भात सध्या उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होते. शनिवारी (दि.१४) वर्धा जिल्हा विदर्भात सर्वात हॉट जिल्हा ठरला. वर्ध्याचे शनिवारी ४६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. मागील २४ तासांत तापमानात २.३ अंशांची वाढ झाली आहे.
यावर्षी उन्हाळा चांगलाच तापत आहे. विदर्भात तर सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवते. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा तापमान वाढू लागले आहे. शुक्रवारी (दि.१३) ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामध्ये २४ तासांमध्ये तब्बल २.३ अंशांनी वाढ होत शनिवारी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळपासूनच उन्हाचे चटके झोंबण्यास सुरूवात होते. दुपारी तर तप्त उन्हामुळे बाहेर पडणे जिकरीचे ठरत असून रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसते. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
अकोला ४४.६, अमरावती ४४.८, बुलडाणा ४०.७, ब्रह्मपुरी ४५.४, चंद्रपूर ४६.२, गडचिरोली ४१.४, गोंदिया ४३.८, नागपूर ४५.४, वर्धा ४६.५, वाशिम ४३.५, यवतमाळ ४५
हेही वाचलंत का ?