गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचे आणखी एक हृदयद्रावक वास्तव समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील कोईदुळ गावात रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून तब्बल दीड किलोमीटर खडतर प्रवास करून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवावे लागले. हा प्रकार पुन्हा एकदा दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवणारा ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोईदुळ येथील ३० वर्षीय गर्भवती पुष्पा सुनील परसा यांना २० जुलै रोजी सकाळी प्रसूतीवेदना सुरू झाल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी गाव गाठले. मात्र, गावापर्यंत जाणारा पक्का रस्ता नसल्याने आणि मध्ये मोठा नाला असल्याने रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थ व आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलेला स्ट्रेचरवर झोपवून नाला पार करत सुमारे दीड किलोमीटर अंतर पायी पार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे तिला कासनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर पुष्पा यांनी सुरक्षितपणे एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कोईदुळ, रेखनार, गट्टागुडेम आणि परिसरातील अनेक गावे पावसाळ्यात पूर्णपणे संपर्कविहीन होतात. गावात जाण्यासाठी दोन मोठे आणि तीन लहान नाले ओलांडावे लागतात. मुसळधार पावसामुळे हे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने वाहतूक ठप्प होते आणि आरोग्य, शिक्षण तसेच दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होतो.
यापूर्वीही या भागातील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. काही वर्षांपूर्वी गोटूल बांधकामानंतर रस्त्याचे काम होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र आजही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णाला किंवा गर्भवती महिलेला उपचारासाठी नेणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी कोईदुळसह परिसरातील गावांना सर्व ऋतूंमध्ये जोडणारा पक्का रस्ता तातडीने मंजूर करून काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.