Rural Child Welfare Gadchiroli
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागातील बालकांच्या पोषण आणि संगोपनासाठी ४५ समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन शनिवारी (दि.५) एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते झाले.
जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट्स यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पाळणाघरांमध्ये तीन वर्षांखालील बालकांना पोषक आहार, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे मातांना रोजगार व उपजीविकेच्या कामांसाठी वेळ देता येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी बुर्गी येथील जिल्हा परिषद शाळेतील डीएमएफ निधीच्या कामांची, तोडसा आश्रमशाळेतील नवीन इमारतीच्या बांधकामाची तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. नागुलवाही येथील रस्त्याच्या कामाची गुणवत्ताही त्यांनी तपासली.
पैमा येथील पाळणाघर हे या उपक्रमातील पहिले केंद्र असून, उर्वरित ४४ पाळणाघरे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी अमर राऊत, भामरागडचे उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, सहायक जिल्हाधिकारी अजय डोके, टाटा ट्रस्ट्सच्या जयिता चौधरी, नीलेश यादव, तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.