JSW Steel Gadchiroli Project
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित जेएसडब्लू स्टील प्रकल्पासाठी सुपीक जमिनी अधिग्रहीत करण्यासंदर्भात प्रशासनाने काढलेला आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी भेंडाळा परिसरातील १४ गावांतील शेकडो नागरिकांनी आज (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध केला. जीव गेला तरी जमीन देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
जिल्हा प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार चामोर्शी तालुक्यातील १४ गावांमधील सुमारे ३ हजार ५०४ हेक्टर जमीन जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रस्तावित स्टील प्लांटसाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रशासनाने ११ फेब्रुवारीला एक आदेश जारी केला. त्यानुसार कार्यवाही झाली तर सर्व शेतकरी भूमिहीन होतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी बचाव जनआंदोलन समिती गठित केली. महिनाभरापासून या समितीच्या माध्यमातून आपली बाजू मांडत आहेत. परंतु प्रशासन चर्चेसाठी तयार नसल्याने हजारो शेतकऱ्यांनी आज संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात मुंडन आंदोलन करुन प्रशासनाला धारेवर धरले. जीवनात आपण प्रथमच शेतकऱ्यांसाठी मुंडन केल्याचे सांगून मुरलीधर महाराज यांनी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी स्टील प्रकल्पासाठी देणार नाही, असा इशारा दिला.
या आंदोलनाला पाठिंबा देत अनेक काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी झाले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत यांच्यासह परिसरातील सुमारे दोन हजार पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या. दडपशाहीने जमीन अधिग्रहीत करण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला.
आ.अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. खा.डॉ.नामदेव किरसान यांनीही पत्राद्वारे शासनाचे लक्ष वेधले. तरीही प्रशासन ऐकत नसेल तर हा लढा दिल्लीपर्यंत नेऊ. प्रसंगी न्यायालयातही धाव घेऊ, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला.