Adivasi Vikas Parishad
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील घटनांची चौकशी करुन विद्यार्थ्यााच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
९ ऑगस्ट २०२५ ते ९ ऑगस्ट २०२६ या वर्षभरात राज्यातील विविध आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, सर्पदंश व आजाराने मृत्यू, विद्यार्थ्यांचा छळ इत्यादी घटना घडल्या असून, आरोग्यविषयक आणि सुरक्षेतील गंभीर त्रुटीही समोर आल्या आहेत. जपतलाई येथील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना अतिशय गंभीर असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवाय नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील आश्रमशाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड परिसरातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना, मोखाडा येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत घडलेला प्रकार आणि नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे मानसिक त्रास होत असल्याबाबत विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारी इत्यादी प्रकरणे गंभीर आहेत.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खाजगी आश्रमशाळा आणि वसतिगृहांचे राज्यव्यापी सुरक्षा ऑडिट करावे, प्रत्येक निवासी शाळेत २४ तास सुरक्षा व्यवस्था, रात्रीची देखरेख, सीसीटीव्ही, प्राथमिक उपचार केंद्र, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी व आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात. सर्पदंशप्रवण भागातील आश्रमशाळांमध्ये विशेष सर्पप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी नियमित समुपदेशन, विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व गोपनीय तक्रार निवारण यंत्रणा आणि आश्रमशाळांना मिळणाऱ्या निधीचे सामाजिक लेखापरीक्षण करावे इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,असा इशाराही आदिवासी विकास परिषदेने दिला आहे.
शिष्टमंडळात अ.भा.आदिवासी विकास परिषदेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव विद्या दुग्गा, तालुकाध्यक्ष लीना कोकोडे, शहर अध्यक्ष आरती कोल्हे, रोहिणी मसराम, माधुरी पडोती, शारदा मडावी, वनिता ताराम, शामला घोडाम, शशिकला जांगी यांचा समावेश होता.