Zero Shadow Day locations in Vidarbha
चंद्रपूर : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे, कारण या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटांसाठी सोडून जाते. तो क्षण आणि दिवस विदर्भात शुक्रवार (दि. १७) पासून अनुभवायला मिळणार आहे. शून्य सावली दिवस केव्हा आणि कुठे घडतो या विषयी माहिती जाणून घेवुया.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० ° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज ०.५० ° सरकतो. म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.
भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबररोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो. तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.
महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० ° अंशावरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्यात २१.९८° अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. एका अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशीं शुन्य सावली दिवस येतात . महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ या दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल. तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल. तर घराच्या छतावर किंवा अंगणात करावे.
या करीता दोन, तीन इंच व्यासाचा, एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू उन्हात सरळ उभी ठेवावी. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.
(वेळा-पूर्वेकडून १२.०५ ते पश्चिमेकडील रेखावृत्तावर १२.३०, एकाच ठिकाणी २ दिवस हा अनुभव घेता येईल.)
१७ मे - अहेरी, आल्लापल्ली, १८ मे - मूलचेरा, १९ मे-गोंडपिंपरी, बल्लारशाह, २० मे -चंद्रपूर (१२.०९), वाशिम (१२.१८), मुकुटबन, पांढरकवडा, झरी, वणी, दिग्रस, लोणार
२१ मे - गडचिरोली (१२.०६), सिंदेवाही, वरोरा, घाटंजी, मेहकर, २२ मे -यवतमाळ (१२.१४), बुलढाणा (१२.२२), आरमोरी, चिमूर २३ मे - अकोला (१२.१८), हिंगणघाट, ब्रम्हपुरी, नागभीड, कुरखेडा, देसाईगंज, रामटेक
२४ मे - वर्धा (१२.१२), शेगाव, पुलगाव, २५ मे - अमरावती (१२.१०), दर्यापूर, २६ मे - नागपूर (१२.१०), आकोट, भंडारा (१२.०८), २७ मे - तुमसर, परतवाडा, रामटेक, २८ मे - गोंदिया (१२.०९) आदी ठिकाणी पाहता येणार आहे, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शुन्य सावली दिवस
१८ मे-पाटण, विरुर, ढाबा, गोंडपिंपरी, १९ मे- राजुरा, कोरपना, गडचांदूर, पोंभूर्णा, कोठारी, राजुरा, बल्लारपूर,
२० मे- मूल, सावली, चंद्रपूर, घुग्गुस, भद्रावती, माजरी
२१ मे-वरोरा, सिंदेवाही, चंदनखेडा, शेगाव, मोहोर्ली,
२२ मे-चिमूर, नेरी, कोलारा, २३ मे-ब्रम्हपुरी, भिसी, नागभीड आदी ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील शून्य सावली दिवस पाहता येणार आहे.