चंद्रपूर

पोलीस अधिक्षकांनी गुन्हेगारावरती आपला सुदर्शन चक्र चालवावा : सुधीर मुनगंटीवार

निलेश पोतदार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा गुन्हेगारांवरती कोणतीही दयामाया न दाखविता आपले सुदर्शन चक्र चालवून हद्दपार करावे असे निर्देश चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर व जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस फुटबॉल ग्राउंड चंद्रपूर येथे "नव चैतन्य" पोलीस महोत्सव तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची एक दिवसीय कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी पोलीस विभागाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून त्यांना शपथ व बॅच वाटप करण्याचा कार्यक्रम आणि चंद्रपूर पोलीस दलाचे नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन काल शनिवारी भरविण्यात आले होते, यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, सीईओ विवेक जॉनसन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव  सुमित जोशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांची उपस्थिती होती.

कोणत्याच गुन्हेगारावरती दयामाया दाखवायची नाही. चंद्रपूर जिल्ह्यातून गुन्हेगारीला हद्दपार करायचे आहे आणि यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे ते म्‍हणाले.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पोलीस विभागाचा हा उपक्रम खूप प्रशंसनीय आहे. लोकांना या द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. हे खूप चांगले कार्य आहे आणि पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या अशा नाविन्यपूर्ण योजनांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील. चंद्रपूर जिल्ह्यातून गुन्हेगारीला हद्दपार करायचे आहे. यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दारूबंदीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी होते, मात्र दारूबंदी उठतात. अपघाताचे प्रमाण हे दुपटीने वाढले ही गोष्ट सर्व नागरिकांनी विचार करण्याची आहे. त्यानंतर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी, पोलीस पाटलांना मार्गदर्शन म्हटले की, पोलीस पाटील हा गावातील व गृह विभाग आणि महसूल विभाग यांना साधणारा महत्त्वाचा दुवा आहे. तो वेळोवेळी गृह विभागाला आणि महसूल विभागाला मदत करत असतो त्यामुळे पोलीस पाटलाचे स्थान हे प्रशासनामध्ये महत्त्वाचे आहे.

पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी, नवचैतन्य ही संकल्पनेविषयी सांगितले की, आपल्या देशाला वाचवायचे असेल तर आपल्याला आपल्या देशातील विद्यार्थी युवक यांना वाचवीले पाहिजे तरच आपला देश महासत्ता होऊ शकतो. आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये शाळेमध्ये आमचे पोलीस विभागाचे ब्रँड अँबेसिडर नेमलेले आहे. ते मुलांना विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील. त्यांनी कोणतेही व्यसन करू नये, दुचाकी चालवताना नेहमी वाहतूक नियमांचे पालन करावे या विषयी माहिती देतील.

आम्ही नागरिकांना हेल्मेट सक्ती करणार आहोत, पण त्याची सुरुवात आम्ही आमच्या पोलीस विभागामार्फत केली आणि आतापर्यंत 100 पोलीस अंमलदारांना हेल्मेट न लावल्यामुळे चालान केले आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक नागरिकांना हेल्मेट ची सक्ती करणार आहोत. हेल्मेट हे पोलिसांना चालन देण्याचे वाचण्यापासून नाही, तर आपला जीव वाचवण्यासाठी आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी, पोलीस विभागाचा हा उपक्रम नाविन्यपूर्ण आहे. आम्ही स्वतः अधीक्षक साहेब मीटिंग घेऊ चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या रस्ता अपघाताचे प्रमाण कसे कमी करता येईल व आपल्याला लोकांचे प्राण कसे वाचता येईल यावरती मीटिंग घेऊन सदर उपक्रम राबविण्याचे ठरविले सोबत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस पाटील यांना प्रशिक्षित करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा घ्यायची असे ठरवून आजचा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला चंद्रपूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शक पुस्तिका सोबत कोर्ट भैरवींना आणि पोलीस विभागाला नवीन वाहने हस्तांतरित करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातून निवडलेले पोलीस विभागाचे ब्रँड ॲम्बेसिडर यांना पालकमंत्री, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ब्रँड अँबेसिडर चे बॅचेस देण्यात आले. प्रदर्शनीमध्ये विविध पोलीस विभागातील शाखांचे स्टॉल लावण्यात आलेले होते. यामध्ये प्रमुख आकर्षण पोलीस विभागातील विविध शस्त्रांचा स्टॉल हे होते. यामध्ये प्रत्येक स्टॉल हा संदेश देत होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT