Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर : 'महापौर' पद हवे असेल तर पक्ष प्रवेश करा, अशी खुली ऑफर भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली होती. मात्र, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चंद्रपूर जिल्ह्यात जिवंत राहावा व त्याची वाढ व्हावी, यासाठीच पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव धुडकावून लावला. काँग्रेस पेक्षा भाजपने मानसन्मान राखत सव्वा वर्ष महापौर देण्याचे मान्य केल्यामुळेच चंद्रपूर महापालिकेत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांनी 'मातोश्री' वर झालेल्या भेटीत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना पटवून दिले.
तेव्हा ठाकरे यांनी लोकांच्या कामांसाठी सत्तेत जाण्याचा निर्णय योग्य असला तरी धूर्त भाजप पासून सावध आणि चाणाक्ष राहा. स्थानिक पातळीवर पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवा, आवश्यक तिथे भाजपचा विरोध करा, भाजप नेते खूप हुशार आणि चतुर आहेत, तेव्हा दटून रहा आणि टिकून रहा हा मोलाचा सल्ला देत चंद्रपुरातील भाजप- शिवसेना उबाठा युतीला ग्रीन सिग्नल दिला आहे.
महापौर निवडणुकीत भाजप सोबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने युती केल्याने मुंबई पासून चंद्रपूर पर्यंत चांगलाच गदारोळ उडाला आहे. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी गिर्हेची पाठराखण केली होती. तर,मनसे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी या युतीसाठी भाजपने चंद्रपुरात शिवसेनेच्या सहा नगरसेवकाला प्रत्येकी एक कोटी तर अपक्ष नगसेवकांना ५० लाख रूपये दिल्याचा गंभीर आरोप केला होता.
मनसेच्या आरोपाला शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांनी प्रत्युत्तर दिले होते. या आरोप प्रत्यारोपानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही यात उडी घेत शिवसेनेच्या सहाही नगरसेवकांना मुंबईत बोलावून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे जाब विचारणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारी शिवसेनेचे सहा व अपक्ष दोन नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर सर्व आठ नगरसेवक दाखल होवून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीच्या वेळेस शिवसेनेचे सहा नगरसेवक अनुक्रमे जिल्हा प्रमुख संदिप गिहे, उपमहापौर प्रशांत दानव, मनस्वी गिहे, आकाश साखरकर, श्रीमती लांडगे, गटनेता राहुल विरूटकर, श्रृती घाटे तसेच अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर सोबत होते. मातोश्रीवर झालेल्या या भेटीत जिल्हा प्रमुख गिर्हे यांनी चंद्रपूर महापालिकेतील राजकारणाची व सत्ता समिकरणाची माहिती दिली.
तसेच काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतर वेळोवेळी झालेला अपमान याची कल्पना दिली. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महापौर पदासाठी पक्ष प्रवेशाची ऑफर शिवसेना नगरसेवकांसमोर ठेवली होती. मात्र स्थानिक पातळीवर शिवसेना पक्षाचे अस्तित्व कायम ठेवायचे असल्यामुळेच पक्ष प्रवेशाची ऑफर धुडकावून लावली. काँग्रेस पक्ष महापौर पद देण्यास तयार नसल्याने आणि भाजप नेत्यांनी सव्वा सव्वा वर्ष महापौर पद विभागून घेण्याचा तोडगा काढल्याने तसेच ५०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर तसा करार केल्यामुळेच पक्ष वाढीसाठी सव्वा वर्ष महापौर पदाची ऑफर स्वीकारून भाजप सोबत केल्याचे ठाकरे यांना सांगितले.
गिर्हे यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी लोकांच्या कामासाठी, विकासासाठी सत्तेत जाणे वाईट नाही, मात्र पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवा असा सल्ला दिला. पक्षाची भूमिका ही टिकून राहिली पाहिजे, सत्तेत असलो तरी जिथे विरोध करायचा आहे तिथे विरोध करा, भाजप नेते खूप हुशार आणि चतुर आहेत, महापालिकेत भाजपच्या विरोधातही भूमिका मांडण्यास दटून राहा व टिकून राहा असाही सल्ला ठाकरे यांनी दिल्याचे संदीप गिर्हे यांनी सांगितले आहे.