Sardar Patel Birsa Munda Jayanti Event
चंद्रपूर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या गौरवशाली पूर्णतेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चेतना महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने आज शहरात भव्य “राष्ट्रीय एकात्मता दौड (Run for Unity)” आयोजित करण्यात आली होती. या दौडीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह हजारोंच्या संख्येत विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गांधी चौक येथून सुरू झालेली ही राष्ट्रीय एकात्मता दौड जटपूरा गेटपर्यंत पार पडली. संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर घोषणांनी आणि तिरंग्याच्या रंगात न्हालेल्या वातावरणाने चंद्रपूर शहर भारावून गेले होते. सर्व शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दौडीत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले. सरदार पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी दिलेले योगदान तसेच आदिवासी समाजाला संघटित करून स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणारे बिरसा मुंडा यांच्या कार्याचा संदेश या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “राष्ट्रीय एकात्मता ही केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता ती आपल्या कृतीतून दिसली पाहिजे. अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये देशाविषयी अभिमान आणि जबाबदारीची भावना निर्माण होते.”
या दौडीत शिक्षण संस्था चालक अशोक जिवतोडे यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षकवर्ग, स्वयंसेवी संस्था आणि मोठ्या संख्येने चंद्रपुरकर नागरिक उपस्थित होते. शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षेची योग्य व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे ही दौड यशस्वी ठरली.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही ‘रन फॉर युनिटी’ चंद्रपूरकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.