आनंदवन येथे मान्यवरांच्या हस्ते कौतिकराव आणि अनुराधा पाटील यांना प्रतिष्ठित 'साधनाताई बाबा आमटे सह-जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्‍यात आला.  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News : बाबा आमटे–साधनाताईंनी उपेक्षितांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण केला : कौतिकराव ढाले पाटील

'साधनाताई–बाबा आमटे सह-जीवन गौरव' पुरस्काराने कौतिकराव व अनुराधा पाटील यांचा सन्मान

पुढारी वृत्तसेवा

Baba Amte Sah Jeevan Gaurav Puraskar

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी स्वर्गीय साधनाताई यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचितांच्या कल्याणासाठी वेचले. त्यांनी समाजातील गरजू आणि उपेक्षितांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण केला. या दांपत्याचे हे भाग्य की, बाबांनी सुरू केलेले विविध प्रकल्प त्यांच्या नंतरच्या पिढ्या (दुसरी आणि तिसरी पिढी) तितक्याच जोमाने पुढे चालवत आहेत. ही एक विलक्षण आणि दुर्मिळ बाब आहे. बाबा आणि साधनाताईंचे अफाट कार्य समजून घेण्यासाठी समाजसेवक आणि नागरिकांनी 'समिधा', 'प्रकाशवाटा' आणि 'आनंदवन-प्रयोगवन' ही तीन पुस्तके वाचली पाहिजेत, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक कौतिकराव ढाले पाटील यांनी केले.

कौतिकराव व अनुराधा पाटील यांचा सन्मान

आनंदवन येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित 'साधनाताई–बाबा आमटे सह-जीवन गौरव पुरस्कार' सोहळ्यात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक कौतिकराव ढाले पाटील आणि प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांचा सन्मान करण्यात आला. जळगाव येथील 'जैन इरिगेशन सिस्टिम्स'चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रसिद्ध मराठी लेखक-समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, उर्दू व मराठी गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे, कोल्हापूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख व समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, अंबाजोगाई येथील 'साधना सेवाभावी संस्थे'च्या अध्यक्षा शुभादा लोहिया व सचिव दगडू लोमटे, तसेच डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि डॉ. विकास आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाबा आमटेंनी केला संपत्ती आणि सुखसोयींचा त्याग : अनुराधा पाटील

या प्रसंगी अनुराधा पाटील म्हणाल्या, "बाबांवर येशू ख्रिस्त, महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी संपत्ती आणि सुखसोयींचा त्याग केला आणि पत्नी साधनाताई यांच्यासह आजारी व पीडित लोकांचे अश्रू पुसण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी जात, पंथ आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जमीन, जलसिंचन, पर्यावरण आणि रोजगार या क्षेत्रांत समाजासाठी मोठे कार्य उभे केले. मात्र, आज अशा चांगल्या गोष्टींची फारशी दखल घेतली जात नाही. आज देशात बेरोजगारी, आर्थिक संकट आणि पर्यावरण यांवरील चर्चा कमी होत चालल्या आहेत आणि लेखकांचा आवाज दाबला जात आहे," अशी टीका त्यांनी केली.

जगात हास्यापेक्षा वेदना अधिक प्रभावीपणे बोलतात : अशोक जैन

अध्यक्षीय भाषणात अशोक जैन म्हणाले, "या जगात हास्यापेक्षा वेदना अधिक प्रभावीपणे बोलतात. स्वर्गीय बाबा आणि साधनाताई यांनी नेहमीच इतरांच्या आयुष्यातील आजारपण आणि वेदनांवर फुंकर घातली. आयुष्य जगताना, आपण हे जग ज्या स्थितीत आपल्याला मिळाले त्यापेक्षा अधिक चांगले करून ठेवायला हवे. बाबांना माणसांमध्ये नेहमीच ईश्वर दिसायचा. ते संवेदनशील होते आणि म्हणूनच त्यांना आश्रमातील रहिवाशांच्या वेदनांची जाणीव व्हायची. त्यांनी दिव्यांग, अंध, बेरोजगार युवक आणि आदिवासींसाठी सामाजिक कार्याचे आदर्श निर्माण केले. तसेच आनंदवनमध्ये त्यांनी सिंचन, जलसंधारण, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रांत अनेक प्रयोग राबवले," असेही त्यांनी नमूद केले.

मान्यवरांचे मनोगत आणि पुरस्कार वितरण

या प्रसंगी डॉ. दिलीप पांढरपट्टे आणि डॉ. अक्षयकुमार काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कौतिकराव आणि अनुराधा पाटील यांचा एक लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विद्या खांडरे, दिलीप खांडरे आणि अनिकेत लोहिया यांचाही सत्कार करण्यात आला. दगडू लोमटे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. शैलजा वारुरे यांनी पुरस्कार्थींचा परिचय करून दिला. प्रा. मोक्षदा मनोहर आणि राधा सावाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि गौरक्ष शेंद्रे यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT