चंद्रपूर : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून चंद्रपूर–नागपूर महामार्गासह अनेक रस्ते जलमय झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने जिल्हाधिकारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. बुधवार मध्यरात्रीपासून काही तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. सकाळपर्यंत सुमारे ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे चंद्रपूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काल बुधवारी रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता, पावसाने हुलकावणी दिली. काही ठिकाणी पाऊस हलक्या स्वरूपाचा कोसळला आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी चंद्रपूर शहरासह काही तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली, तर काही भागांत रिमझिम पाऊस सुरू होता. काही ठिकाणी अधूनमधून सूर्यदर्शनही झाल्याने पावसाचा जोर सर्वत्र एकसमान नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी सध्या जिल्ह्यात पाऊस खंडित स्वरूपात सुरू आहे. या खंडित पावसाचा फायदा शेतकऱ्यांना होत असून भात पिकाच्या रोवणीच्या कामांना चांगला वेग आला आहे. शेतकरी उपलब्ध ओलाव्याचा लाभ घेत शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले, पूल आणि जलसाठ्यांजवळ जाणे टाळण्याचे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या पुढील सूचनांवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष असून परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.