चंद्रपूर

Chandrapur rural news: तीन दशकांचा वनवास! रस्ते, पाणी, वीज यांचा बोजवारा; ३० वर्षांपासून नवेगाव विकासाच्या प्रतीक्षेत

ग्रामपंचायत वरोडा राजुरा तालुक्यात, तर गाव कोरपना तालुक्यात; रस्ता, नाल्या, स्मशानभूमीच्या प्रश्नांवर ग्रामस्थांचा शासनाला सवाल

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : प्रशासकीय विसंगतीचा फटका बसत असल्याचा आरोप करीत नवेगाव ग्रामस्थांनी गेल्या ३० वर्षांपासून गाव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत व्यक्त केली आहे. नवेगाव गाव कोरपना तालुक्यात येत असले, तरी गावाची ग्रामपंचायत वरोडा ही राजुरा तालुक्यात असल्याने विकासकामे, शासकीय योजना आणि निधीच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. “एक गाव, दोन तालुके आणि विकास मात्र कुठेच नाही,” अशी संतप्त भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

नवेगावच्या विविध विकासकामांसाठी ग्रामस्थांना संबंधित कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगण्यात येते. गावाच्या प्रशासकीय स्थितीमुळे कोणत्या विभागाकडे विकासकामांसाठी पाठपुरावा करायचा, हा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

रस्त्याची दुरवस्था, नाल्यांमुळे आरोग्याचा प्रश्न

नवेगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या समस्येबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासोबतच गावातील नाल्यांची अवस्थाही बिकट झाली असून सांडपाणी आणि घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गावातील मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

दोन वर्षांपासून स्मशानभूमीचे काम रखडले

नवेगावातील स्मशानभूमीचे काम सुरू करण्यात आले होते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे काम बंद अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामाबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, “निधी येत नाही,” असे उत्तर मिळत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे निधी उपलब्ध होत नसेल तर तो नेमका कुठे आणि का अडकला आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गावाच्या विकासासाठी नेमके कोणते प्रशासन जबाबदार आहे, याबाबतही स्पष्टता आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

गावकऱ्यांची प्रशासकीय पुनर्रचनेची मागणी

या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर नवेगाव ग्रामस्थांनी आता शासनाकडे ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. नवेगाव गावाचा समावेश एकतर राजुरा तालुक्यात करावा किंवा नवेगावची ग्रामपंचायत कोरपना तालुक्यात समाविष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गाव एकाच प्रशासकीय चौकटीत आल्यास शासनाच्या विविध योजना, निधी आणि विकासकामांची अंमलबजावणी अधिक सुलभ होईल, असा ग्रामस्थांचा विश्वास आहे.

“विकास कोण करणार?” हा थेट सवाल

नवेगावचा प्रश्न केवळ रस्ता, नाली किंवा स्मशानभूमीपुरता मर्यादित नसून गेल्या तीन दशकांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या गावाच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने नवेगावच्या प्रशासकीय स्थितीचा गांभीर्याने पुनर्विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

आमच्या गावाचा विकास कोण करणार?; ग्रामस्थांचा सवाल

“आम्ही कोणत्या तालुक्यात आहोत, यापेक्षा आमच्या गावाचा विकास कोण करणार?” असा थेट सवाल ग्रामस्थांनी शासनाला केला आहे. आता आश्वासनांपेक्षा रस्ता, स्वच्छ नाल्या, पूर्ण स्मशानभूमी आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ मिळावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. ३० वर्षांची प्रतीक्षा संपणार का आणि नवेगाव विकासाच्या मुख्य प्रवाहात कधी येणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT