Chandrapur Lohar Dongri mining controversy
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील लोहार डोंगरी येथे प्रस्तावित असलेल्या खाण प्रकल्पामुळे पर्यावरण आणि वन्यजीवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच वेकोली क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय कोळसा मंत्री जी किसन रेड्डीयांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील लोहार डोंगरी परिसरात प्रस्तावित असलेल्या खाण प्रकल्पामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची आणि वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कोळसा मंत्री जी किसन रेड्डी यांची भेट घेऊन या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.
नागभीड तालुकतील लोहार डोंगरी हा परिसर व्याघ्रांसाठी महत्त्वाचा भ्रमणमार्ग असल्याने येथे खाणकाम सुरू झाल्यास जंगलाचा ऱ्हास होऊन वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होईल. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण होईल, अशी भीती खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे पर्यावरणाला आणि स्थानिक जनतेला मोठा धोका निर्माण करणारा हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
यावेळी खासदार धानोरकर यांनी वेकोली अंतर्गत येणाऱ्या वणी, बल्लारपूर, माजरी आणि वणी-नॉर्थ या क्षेत्रांतील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडेही केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. पवन खाण, विरूर-गाडेगाव, पैनगंगा, निलजई आदी खाण प्रकल्पांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र तांत्रिक कारणांमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उर्वरित जमीन अद्याप वेकोलीने ताब्यात घेतलेली नाही.
यामुळे शेतकऱ्यांना ना जमीन वापरता येत आहे, ना त्यांना योग्य मोबदला मिळत आहे. परिणामी अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांचे शेतीवर आधारित उपजीविकेचे साधनच धोक्यात आले आहे, अशी बाब खासदारांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
तसेच वेकोलीकडून खाणींमधून काढण्यात येणारी माती शेतशिवाराजवळ टाकली जात असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रारही त्यांनी केली. काही ठिकाणी शेतात जाणारे रस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे. याशिवाय काही भागात नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाल्याने शेती करणे अवघड झाले आहे. या सर्व समस्यांमुळे स्थानिक शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वेकोलीचे अध्यक्ष तसेच सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणीही खासदार धानोरकर यांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे केली.