Jivti Taluka Snake Bite Child Death
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील लक्ष्मणगुडा गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने अवघ्या सहा वर्षीय समीर मारोती आत्राम या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाला खासगी वाहनातून रुग्णालयात हलवावे लागले. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जिवती तालुक्यातील लक्ष्मणगुडा गावातील समीर मारोती आत्राम हा सहा वर्षीय मुलगा पहाटे आपल्या घरात झोपलेला असताना विषारी सापाने त्याला दंश केल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी बराच वेळ होऊनही समीर झोपेतून उठला नाही. त्याचवेळी घरामध्ये विषारी साप आढळून आल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कुटुंबीयांनी तातडीने समीरला उपचारासाठी पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
मात्र, या गंभीर परिस्थितीतही प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे मुलाला पुढील उपचारासाठी हलविण्यात विलंब झाला. अखेर कुटुंबीयांनी खासगी वाहनाची व्यवस्था करून समीरला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारासाठी पोहोचण्यापूर्वीच उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, डॉक्टरांची उपलब्धता, तातडीची वैद्यकीय सुविधा आणि रुग्णवाहिकेच्या अभावामुळे निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जिवती तालुक्यात एका गर्भवती महिलेने नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर रस्ता नसल्याने आणि वेळेत रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला होता. ती घटना अद्याप ताजी असतानाच पुन्हा एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सतत घडणाऱ्या अशा दुर्दैवी घटनांमुळे जिवती तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये आरोग्य सुविधा सक्षम करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोग्य यंत्रणेमधील त्रुटी दूर कराव्यात, तसेच तातडीने पुरेशा रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.