Chandrapur Farmers Kharif Season
चंद्रपूर : जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.२२) झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून रखडलेल्या खरीप पेरण्यांना आता वेग मिळणार आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांनी शेती कामांना सुरुवात केली असून शेतांमध्ये पुन्हा एकदा लगबगीचे चित्र पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या आगमनानंतर अपेक्षित पाऊस झाला नव्हता. जून महिन्याच्या अखेरीपर्यंतही पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. पेरणीसाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावा नसल्याने शेतकरी चिंतेत होते. अनेकांनी शेतीची पूर्वमशागत करूनही पावसाच्या प्रतीक्षेत थांबावे लागत होते.
मात्र, काल जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता शेती मशागत, बियाण्यांची तयारी आणि पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. विविध गावांमध्ये शेतांमध्ये ट्रॅक्टर, बैलजोडी आणि शेतमजुरांची लगबग सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या तालुक्यांमध्ये धान हे प्रमुख पीक घेतले जाते. तर राजुरा, वरोरा, भद्रावती, कोरपना, जिवती, बल्लारपूर आणि गोंडपिंपरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व कापूस पिकांची लागवड केली जाते. या भागातही पावसामुळे पेरणीच्या कामांना गती मिळणार आहे.
तसेच नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मुल, चिमूर आणि सावली तालुक्यांमध्ये धान लागवडीला विशेष वेग येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामासाठी आवश्यक तयारी सुरू केली असून आगामी काळात पाऊस सातत्याने राहिल्यास शेतकरी हंगाम वेळेत पूर्ण करणार अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.