चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज रविवारी भारतीय जनता पक्षाने मोठ्या शक्तिप्रदर्शनात केला. प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात दाखल झाले आणि महायुतीच्या निवडणूक रथावर उभे राहत शहरात भव्य रोड शो केला.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेल्या देवी महाकाली मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मातेचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर अंचलेश्वर गेट परिसरातून त्यांनी रोड शोला सुरुवात केली. मंदिर दर्शनानंतर निघालेल्या या प्रचार यात्रेत हजारो कार्यकर्ते, नागरिक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
सुमारे तीन किलोमीटरच्या या रोड शो दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुल्या निवडणूक रथावर उभे राहत शहरवासीयांकडे मताशीर्वाद मागितले. विशेष म्हणजे, मागील महिनाभर पक्षांतर्गत मतभेदामुळे चर्चेत राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत निवडणूक रथावर उपस्थित होते. दोन्ही नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उजव्या-डाव्या बाजूला उभे राहून हात उंचावत अभिवादन करताना दिसल्याने, भाजपमधील अंतर्गत समन्वयाचा संदेश या रोड शोमधून प्रभावीपणे पोहोचला.
रोड शोचा समारोप विजय संकल्प यात्रेच्या समारोपस्थळी, चंद्रपूरच्या ऐतिहासिक जटपुरा गेट येथे करण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटल्याने, पक्ष प्रचारात आता अधिक आक्रमकता आणि नियोजनबद्धता दिसून येईल, असे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमुळे महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रचाराचा पुढील टप्पा अधिक गतिमान होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
विकासाच्या अजेंड्याला साथ द्या, शहराच्या प्रगतीला मत द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेतील विकास निधी, शहर विकासाचा अजेंडा आणि भ्रष्टाचार विरोध या मुद्द्यांवर जोरदार भाष्य केले. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना आम्ही शहरासाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणला आणि मूलभूत सुविधांच्या बळकटीसाठी काम केले. आता येणाऱ्या निवडणुकीत मनपावर भाजपचा झेंडा फडकवा. भ्रष्टाचारी, दलाल आणि अनाचारी सत्ता चंद्रपुरात पुन्हा येऊ देऊ नका. विकासाच्या अजेंड्याला साथ द्या, शहराच्या प्रगतीला मत द्या,” असे आवाहन त्यांनी केले