वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत या तणाविषयी माहिती जाणून घेतली. Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | ‘मंड्या’ तण नियंत्रणासाठी कृषी विभाग सज्ज; चिंधीचक परिसरात वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञांची भेट

‘दात्या’ (इचिनो क्लोवा कोलोना) तणाचे लवकर नियंत्रण आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

Paddy Crop Weed Management Vidarbha

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर वाढत्या ‘मंड्या’ तणाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नागभीड तालुक्यातील चिंधीचक परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत या तणाविषयी माहिती जाणून घेतली.

मागील दोन वर्षांपासून हा तण मोठ्या प्रमाणात नागभीड सह पूर्व विदर्भात धान पिकामध्ये पसरत आहे. पावसाळी आणि दोन्ही पिकामध्ये वाढत असलेल्या ‘मंड्या’ तणाच्या समस्येची दखल घेत कृषी विभागाने चिंधीचक परिसरात मनोज कावळे आणि राकेश सातपैसे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्याशी संवाद साधला. या पाहणीदरम्यान नागपूर येथील वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते, तालुका कृषी अधिकारी पुजारी, सहाय्यक कृषी अधिकारी पवार, मंडळ कृषी अधिकारी संजय पाखमोडे तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी 'दै. पुढारी'शी  बोलताना डॉ. नागदेवते यांनी सांगितले की, शेतकरी ‘मंड्या’ म्हणून ओळखत असलेले हे तण मराठीत ‘दात्या’ या नावाने ओळखले जाते, तर इंग्रजीमध्ये त्याला Echino chloa colona असे म्हटले जाते. धान पिकामध्ये दिसणारे हे तण सुरुवातीच्या अवस्थेत धानासारखेच असल्यामुळे ओळखणे कठीण जाते.

खरीप हंगामात विविध प्रकारची तणे एकत्र वाढत असल्यामुळे ‘दात्या’ तणाचा प्रभाव तुलनेने कमी जाणवतो. मात्र, उन्हाळी धान पिकामध्ये इतर तणांचे प्रमाण कमी असल्यामुळे हे तण अधिक जोमाने वाढते. विशेषतः उष्ण व दमट वातावरणात त्याची वाढ झपाट्याने होते.

डॉ. नागदेवते यांनी स्पष्ट केले की, खरीप हंगामात हे तण धानाच्या उंचीइतकेच राहते, तर उन्हाळी हंगामात ते धानापेक्षा अधिक उंच वाढते. एकदा ते मोठे झाल्यानंतर त्याचे निंदन करणे कठीण होते आणि त्यासाठी मोठा खर्च व श्रम लागतात.

पाहणी केल्यानंतर  सध्या तरी हे तण बियाणे, खत किंवा इतर कोणत्या माध्यमातून शेतात येते याचा ठोस स्रोत आढळलेला नाही. मात्र, त्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या अवस्थेतच त्याचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तण नियंत्रणासाठी त्यांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या.  रोवणी केल्यानंतर १८ दिवसांच्या आत तणनाशकांची फवारणी केल्यास ‘दात्या’ तणावर नियंत्रण मिळवता येते. त्यानंतरही तणाचा प्रादुर्भाव दिसल्यास २५ ते ३० दिवसांच्या दरम्यान पुन्हा फवारणी करणे आवश्यक आहे.

तसेच, एकदा हे तण मोठे झाल्यानंतर साध्या तणनाशकांद्वारे त्याचे नियंत्रण करणे कठीण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा, हे तण धानाच्या वाढीस अडथळा आणून संपूर्ण पीक नष्ट करू शकते.

डॉ. नागदेवते यांनी सांगितले की, अवत्या (थेट पेरणी) धानामध्ये या तणाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे, तर रोपांतरित (रोवणी) पिकामध्ये त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे योग्य पद्धतीची लागवड आणि व्यवस्थापन यावर भर देणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी कृषी विभागाने विशेष मोहिमा, प्रशिक्षण शिबिरे आणि कार्यशाळांचे आयोजन करून गाव पातळीवर मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सध्या शेतकरी ‘दात्या’ तणाच्या वाढत्या संकटामुळे चिंतेत असून, वेळेवर उपाययोजना केल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल.
- डॉ. विनोद नागदेवते, वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नागपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT