आनंदवन हत्या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकाची बदली करण्यात आली  Pudhari News Network
चंद्रपूर

आनंदवन हत्या प्रकरण : वरोरा पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

तिघा पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर दुसरी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : आनंदवनातील २४ वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने वरोरा पोलीस ठाण्याच्या कोठडीत गळफास घेऊन जीवन संपविले होते. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी तडका-फडकी निर्णय घेत तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत केले होते. त्यानंतर वरोरा पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांची चंद्रपूर नियंत्रण कक्षात आज (दि.२) तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मुंबई येथून आलेले अजिंक्य तांबडे यांना नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.

मृत आरोपी समाधान कोळी याने वरोरा पोलिस ठाण्याच्या कोठडीत आपली जीवनयात्रा संपविल्याने पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस हवालदार धनंजय वरगंटीवार, महिला पोलीस हवालदार मनीषा कुत्तरमारे व पोलीस शिपाई नितीन तुराळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्याही कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

वरोरा येथील आनंदवनात आई-वडिलांकडे राहत असलेल्या २४ वर्षीय आरती चंद्रवंशी या तरूणीची तेथेच उपचारासाठी राहत असलेल्या समाधान कोळी या युवकाने प्रेम प्रकरणातून अत्याचार करून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात वरोरा पोलीसांनी २४ तासाच्या आत आरोपीला अटक केली. न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर आरोपी कोळी हा वरोरा पोलिस ठाण्याच्या कोठडीत होता. पोलिस कस्टडीत असतानाच आरोपी समाधान कोळी याने रविवारी सकाळी पोलिस कोठडीत शौचालयाच्या दरवाज्याला बुटातील लेसने गळफास घेऊन जीवन संपविले होते. ज्यावेळी त्याने जीवन संपविले, त्यावेळी कोठडीत सेवेवर कुणीच कर्मचारी नव्हते.

पोलीस कोठडी असताना आरोपींवर देखरेख ठेवण्याची जवाबदारी पोलीस हवालदार धनंजय वरगंटीवार, महिला पोलीस हवालदार मनीषा कुत्तरमारे व पोलीस शिपाई नितीन तुराळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी सेवेवर असताना आपल्या कर्तव्यात कसूर केली. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी बुटमधील लेस काढताना दिसतो आहे. या सर्व प्रकरणाची सेवेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नोंद घेतली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

त्यानंतर पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी आज (मंगळवारी) वरोऱ्याचे ठाणेदार अमोल काचोरे यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी ठरवले. व त्यांची चंद्रपूर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मुंबई येथील अजिंक्य तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT