देऊळगाव राजा ः काळोणावाडी येथील ग्रामस्थांनी विविध मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सोमवारी (दि.9) पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मागण्या मान्य झाल्याने मंगळवारी (दि.10) रोजी उपोषण सुटले आहे.
9 फेब्रुवारी जी बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, विशाल थुट्टे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ उपोषणास बसले. ग्रामस्थांच्या आंदोलनाची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.
यावेळी आमदार मनोज कायदे यांच्या सासऱ्यांनी रस्ता व स्मशानभूमीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले. तसेच जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दूरध्वनीद्वारे गावातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
प्रशासनाकडून सर्व मागण्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आल्याने आणि कार्यवाहीसाठी काही अवधी आवश्यक असल्यामुळे पहिल्याच दिवशी उपोषणाची सांगता लिंबू सरबत देऊन करण्यात आली.
उपोषणस्थळी चिखली तहसीलचे नायब तहसीलदार गायकवाड, अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे पांडे, बांधकाम विभागाचे चेके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच पंजाबराव जावळे, विष्णू पाटील घुबे, प्रा. उद्धव घुबे, सतीश पाटील भुतेकर, उषाताई थुट्टे उपस्थित होते.
या मागण्या
काळोना गाव महसूल पटलावर समाविष्ट करणे, गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे, स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणे, खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ गावाला देणे.