Crops rely on sprinkler irrigation; farmers' anxiety mounts
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील अंढेरा परिसरासह अनेक गावांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. विशेषतः सोयाबीन पीक सध्या फुलोरा व फळधारणेच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना पाण्याची कमतरता जाणवत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विहीर व बोअरवेलची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर तुषार सिंचनाचा आधार घेत पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अंढेरा, पिंपरीआंधळे, बायगाव खुर्द, सावखेड नागरे, मेंडगाव तसेच मेहुणा राजा, टाकरखेड भागिले, नारायणखेड, सरंबा, देऊळगाव मही, पाडळी शिंदे, शिवनी आरमाळ, मंडपगाव, चिंचखेड आदी परिसरातील शिवारांमध्ये पावसाचे प्रमाण कमी अधिक राहिले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी अनेक भागांत पावसाअभावी पिके अडचणीत आली आहेत.
सोयाबीन पिकाच्या मशागतीपासून कोळपणी, निंदणी, फवारणी यासह आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. एकरी सुमारे १५ ते २० हजार रुपयांपर्यंत खर्च झाल्यानंतर आता पीक हातात येण्याच्या प्रतीक्षेत असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आसमानी संकटात सध्या शेतकरी सापडला आहे.