भंडारा : मोठ्या पुलावर साचलेल्या पाण्यातून होत असलेली वाहतूक. (Pudhari Photo)
भंडारा

Bhandara Rain News | पावसाची संततधार, रस्ते जलमय, तीन मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत

दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे

पुढारी वृत्तसेवा

Bhandara Rain News

भंडारा : दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचे पाणी सखल भागात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. रविवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीपासून सोमवारी दिवसभर जोरदार पाऊस बरसला.

भंडारा शहरातील सखल भागात नेहमीच पावसाचे पाणी शिरते. आता पुन्हा हे पाणी या भागात शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरात भूयारी गटारीच्या कामामुळे खोदलेले रस्ते चिखलमय झाले असून रहदारीसाठी अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर अपघाताचा धोका वाढला आहे.

पहाटेपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती.

गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढला

संततधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. गोसेखुर्द धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पुरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. सध्या या धरणातून १२०० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून गरजेनुसार ६ हजार क्युमेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार आहे. सध्या गोसेखुर्द धरणाच्या ९ वक्रद्वारातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय धापेवाडा धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून ३ हजार ५३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारा शहराजवळच्या कारधा येथील वैनगंगा नदीची धोक्याची पातळी २४५.५० मीटर असून सध्याची पातळी २४२.२९ मीटर आहे.

तीन मार्ग बंद

रविवारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार असून काही मार्गावर पाणी आल्याने ते मार्ग बंद करण्यात आले आहे. भंडारा ते कारधा नदीपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमनी आणि चुल्हाड ते सुकळी नकुल दोन मार्गांवर पाणी आल्याने हे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

मोठ्या पुलावर साचले पाणी, अपघाताचा धोका

भंडारा बायपास मार्गाचे दोन दिवसांपूर्वी लोकार्पण करण्यात आल्याने भंडारा शहरातून होणारी जड वाहतूक कमी झाली आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या पुलावरुन मात्र हलक्या वाहनांची रहदारी कायम आहे. या पुलाची डागडुजी झाली नसल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आता याच खड्ड्यांमध्ये सुमारे एक फुट पाणी साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुलावरुन पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तीनच दिवसांपूर्वी माजी खा. सुनील मेंढे यांनी संबंधित अधिकाºयांना पुलावरुन पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि खड्डयांची डागडुजी करावी, अशी सूचना केली होती. तरीसुद्धा अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, या पुलावर अपघाताचा धोका कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT