ठाणे : राज्यातील जिल्हा परिषद शाळांना ‘स्मार्ट’ आणि स्पर्धात्मक बनविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक शाळेत स्मार्ट टीव्हीद्वारे डिजिटल शिक्षण, सेमी-इंग्रजी वर्गांची सुरुवात, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वेळेवर वितरण, पोषण आहाराची प्रभावी अंमलबजावणी, तसेच ‘शाळा आपल्या दारी’ उपक्रमातून शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधणे अशा विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. याशिवाय, यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे अनुभव समाजमाध्यमांतून प्रसारित करून सरकारी शाळांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या घटत असल्याचे चित्र समोर आले आहे. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणामुळे पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला होता. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय समितीने सादर केलेल्या अहवालात सरकारी शाळांची गुणवत्ता, सुविधा आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यात आल्या. त्यानुसार मार्च ते जून 2026 या कालावधीत ही मोहीम राबवून शाळांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या मोहिमेत पालक-शाळा संवादाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ‘माता-पालक मेळावे’ आयोजित करून मुलांचा आहार, आरोग्य आणि अभ्यासाच्या सवयी यावर चर्चा केली जाणार आहे. शिक्षणाची वारी, ग्रंथदिंडी आणि चावडी वाचन यांसारख्या उपक्रमांतून गावागावांत शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रत्येक बीट स्तरावर ‘आदर्श शाळा’ विकसित करून इतर शाळांसाठी मार्गदर्शक मॉडेल उभे करण्याचा मानस आहे.
प्रशासकीय पातळीवरही या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी ‘केंद्र दत्तक’ घेऊन त्या भागातील शाळांच्या भौतिक सुविधा, शिक्षकांची उपलब्धता आणि शिक्षणाची गुणवत्ता यावर थेट लक्ष ठेवतील. नियमित आढावा घेऊन आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
झेडपी शाळांमध्ये स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून डिजिटल शिक्षणावर भर दिला जाणार आहे. दृश्य-श्राव्य साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांची समज वाढवणे, शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक बनवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणाला प्रतिसाद देत झेडपी शाळांमध्ये सेमी-इंग्रजी वर्ग सुरू करण्यावर भर दिला जात आहे. मातृभाषेसोबत इंग्रजीचे ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक क्षमता वाढेल आणि पालकांचा सरकारी शाळांकडे कल वाढण्यास मदत होईल.
जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना स्थानिक करात सवलत देण्याची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. या प्रोत्साहनपर योजनेमुळे आर्थिक लाभासह शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन पटसंख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.