उरण : एमएमआरडीएच्या प्रस्तावित तिसऱ्या मुंबई (केएससी नवनगर) प्रकल्पासाठी उरण तालुक्यात सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रशासनाने सर्वेक्षणासाठी जमिनीवर आखलेले पट्टे आणि चिन्हे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेटवून दिली, तर काही ठिकाणी त्यावर काळे फासून आपला संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर, सोमवारी उरण तहसीलदारांना निवेदन देऊन हे सर्वेक्षण तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून उरणमधील सारडे, चिरनेर पाठोपाठ आता खोपटे विभागातील जमिनींचे सर्वेक्षण करण्यासाठी एमएमआरडीएचे पथक दाखल झाले होते. मात्र, जमिनींचे संपादन होण्याच्या भीतीने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. खोपटे विभागात सर्वेक्षणासाठी आलेल्या कामगारांना माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेंद्र पाटील यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी अक्षरशः हुसकावून लावले. रंगाने आखलेले पट्टे पेटवून देत शेतकऱ्यांनी सरकारने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला.
एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीने या प्रकल्पासाठी देऊ केलेल्या 22.50 टक्के विकसित भूखंडाच्या योजनेला कडाडून विरोध केला आहे. ही योजना शेतकऱ्यांना बिल्डर लॉबीच्या दावणीला बांधणारी असल्याचा आरोप समितीने केला आहे. शेतकऱ्यांना 2013 च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या चौपट मोबदला मिळावा. प्रकल्प लादण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांची गावे आणि घरे नियमित करावीत, अशी अट शेतकऱ्यांनी घातली आहे.
आम्हाला जमिनीच्या बदल्यात तुकडा नको, तर 2013 च्या कायद्यानुसार हक्क हवा आहे. आधी आमची घरे नियमित करा, मगच प्रकल्पाचे बोला. तोपर्यंत एक इंचही जमीन सर्वेक्षणासाठी देणार नाही.एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती
प्रकल्पाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 महसूल गावांमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. एमएमआरडीएने ड्रोन सर्वेक्षण सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण असून, भूसंपादन कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. या बाबत आज तहसिलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.