ठाणे : ओला, उबेर, रॅपीडोच्या संपावरून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाकडून काय मदत हवी आहे, नेमक्या तुमच्या अपेक्षा काय आहेत हे स्पष्टपणे सांगावे. राज्य शासन त्याचा विचार करेल, मात्र अशाप्रकारे संप करून नागरिकांना वेठीस धरणार असला तर योग्य ती कारवाई करावी लागेल, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला आहे.
राज्यात बेकायदेशीररित्या चालवण्यात येणाऱ्या टॅक्सी आणि बाईकच्या विरोधात तसेच अँप आधारित काम कंपन्यांनी लागू केलेल्या मनमानी भाड्याच्या विरोधात शनिवारपासून ओला, उबेर मालकांनी संप पुराकला आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले. यासंदर्भात ठाण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सरनाईक यांनी मात्र ओला, उबेर चालक मालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सरनाईक म्हणाले,आम्ही ओला, उबेर मालकांच्या संपर्कात आहोत. मात्र अशा प्रकारे संपाचे हत्यार उपसून नागरिकांचे हाल करणे योग्य नाही. सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक हे फिरायला किंवा कामानिमित्त बाहेर पडत असतात, अशा संपामुळे नागरिकांचे हाल होत आहे. त्यांची शासनाकडून काय अपेक्षा आहे ती त्यांनी सांगावी, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, मात्र जर नागरिकांना अशाप्रकारे वेठीस धरणार असाल तर मात्र कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.