The old Mumbai-Pune highway will go underwater this year
नेवाळी : पुढारी वृत्तसेवा
अतिक्रमणांमुळे १४ गावांना नवी मुंबईत विरोध सुरु असताना या गावांमधील धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. या गावांच्या वेशीवरून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. या महाभयंकर अतिक्रमणामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद होत असल्याने महामार्गाला मुसळधार पावसात नदीचे स्वरूप प्राप्त होतो. यंदा पावसाळ्यात नैसर्गिक नाल्यांची मुक्ततेचा श्वास घेतला नसल्याने महामार्ग मुसळधार पावसात पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे तालुक्यातील १४ गावांमधून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे रूपांतर दरवर्षी नदीपात्रात होत असतो. महामार्गावर पाणी आल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. सद्य स्थितीत उत्तरशिव, गोठेघर, दहिसर परिसरात भंगार माफियांनी सर्व नैसर्गिक नाले बंद केले आहेत. या नाल्यांवर कंटेनर उभे केले आहेत. तर काही ठिकाणी नाले बुजविण्यातआले आहेत. भंगार माफियांनी घातलेला हैदोस पाहून राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी देखील हा मुद्दा उपस्थित करत १४ गावे नवी मुंबईत घेण्यास विरोध दर्शविला आहे.
मात्र सद्य स्थितीत या गावांमधील सुरु असलेल्या भंगार माफियांच्या हालचालींवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे या भंगारमाफियांचे अतिक्रमण वेळेत हटलं नाही तर महामार्ग पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची भीती यंदा देखील जैसे थे आहे.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असलेले नैसर्गिक नाले हे साध्य भंगार माफियांच्या अतिक्रमनाने बंद झाले आहेत. वाढते अतिक्रमण या परिसरासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊल उचलणे गरजेच आहे. मात्र या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष सुरु असल्याने प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.