ठाणे : घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील स्वामीच्या मठावर कारवाई करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यासाठी दिंडोरी येथील स्वामींच्या अनुयायांना चुकीची माहिती देऊन स्वामींचे पोस्टर फाडण्यात आले आहे, असा आरोप स्वामी समर्थ मठाच्या विश्वस्तांनी केला. तर, स्वामी भक्तीत राजकारण आणू नका; स्वामींची लाठी पडली तर महाग पडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला. दुसरीकडे एकाच जागेवर दोन संस्थांनी दोन मठे असून तिथे स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होत असते.
आनंद नगर येथे म्हाडाच्या भूखंडावर स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आलेला आहे. या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे. आज प्रगट दिनानिमित्त या मठात हजारो भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. त्याच्या शेजारी स्वामींचे दुसरे मठ बांधण्यात आले असून त्या ठिकाणी ही मठ स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यास अपयश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा मठ जमीनदोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात 10 नोव्हेंबर 2025 रोजी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली
स्वामीभक्तांनी ठामपा मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळेस आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत नवीन नोटीस बजाविण्यात आली नसली तरी मठ तोडून उद्यान बनविण्याच्या हालचाली अद्यापही सुरू आहेत. त्यातूनच एका स्थानिक पुढाऱ्याने दिंडोरी येथी विश्वस्तांना चुकीची माहिती दिली. त्यामुळेच येथील मठाबाहेरील फलक फाडण्यात आला. आज प्रगट दिनी दर्शनासाठी मनोज प्रधान हे गेले असता, मठाच्या विश्वस्तांनी ही बाब प्रधान यांना सांगितली.
त्यानंतर प्रधान यांनी मठातच पत्रकारांशी संवाद साधताना, आम्ही केलेल्या आंदोलनानंतर ठामपाकडून नवीन नोटीस आलेली नाही. मात्र, 7 दिवसा पूर्वी येथील फलक फाडण्यात आला. त्यासाठी या ठिकाणी गायी बांधल्या असल्याचे तसेच अन्नधान्याची साठवणूक केली असल्याची खोटी माहिती एका पुढाऱ्याने दिंडोरी विश्वस्तांना दिली होती.
वास्तविक पाहता, गाय ही हिंदू धर्मात पुजनिय असल्याने ती येथे बांधण्यात आली होती. तर, महाप्रसादासाठीचे धान्याची साठवणूक केली होती.