Commissioner Saurabh Rao
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रस्ते दुरूस्तीबाबत सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. Pudhari News Network
ठाणे

ठाण्यात रस्त्याची मालकी, रस्ते दुरुस्तीसाठी त्रिसूत्री यंत्रणा राबवा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.

सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभाग प्रमुखांची बैठक

पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा, विशेषत: घोडबंदर रोडचा, आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत, ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, मेट्रोचे समन्वयक जयंत डहाणे, कायर्कारी अभियंता सुरेंद्र शेवाळे आणि अतुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर रेखांकन करावे.

आनंदनगर चेक नाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत, तसेच, त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचे काम सुरू आहे, उड्डाणपूलांची जबाबदारी कोणाची आहे. या विषयीची स्पष्टता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचे रेखांकन करावे. त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल आणि संदिग्ध स्थिती होणार नाही, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

एकमेकांना सहाय्य करून कमी वेळेत रस्ता दुरुस्त करणे

त्याचबरोबर, पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ हे एकाच यंत्रणेचा भाग आहेत. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणे हेच आपले मुख्य उद्दीष्ट आहे. याचा पुनरुच्चार आयुक्त राव यांनी केला.

या बैठकीत, घोडबंदर सेवा रस्ता कामातील अडचणी, भाईंदरपाडा येथील मलनि:सारण वाहिनीचे काम, नागला बंदर परिसरातील मेट्रोच्या कामामुळे आवश्यक असलेली रस्ते दुरुस्ती आणि आनंद नगर चेक नाका येथील रस्त्याची स्थिती आणि त्यावरील तांत्रिक उपाययोजना याबद्दल चर्चा झाली.

SCROLL FOR NEXT